Saturday, December 30, 2023

भीमेश्वर महादेव मंदिर , सामलकोट

 *भीमेश्वर महादेव मंदिर, सामलकोट, आंध्रप्रदेश*

सामलकोट जवळ चालुक्यांच्या राजवटीत बांधलेले नवव्या शतकातील भीमेश्वर महादेव मंदिर आहे. फार प्रशस्त आवार त्याला चहूबाजूंनी पंधरा फूट उंच परकोट बांधलेला आहे. परकोटाचे बांधकाम कोकणातील जांभा दगडासारख्या सच्छिद्र दगडांंचे आहे. इथे गौमुखा ऐवजी गजमुख आहे. याचा अर्थ मंदिर राजांनी बांधले आहे. 

मूळ मंदिरात चारी बाजूंनी प्रवेशद्वार आहे. शिवलिंग दोन मजल्यांपेक्षा उंच आहे. त्यात वाढ होत असते अशी आख्यायिका ऐकायला मिळाली. मंदिरा च्या दगडी खांबांवर सुंदर नक्षी कोरलेली आहे. चारी बाजूंनी दगडी चौथरे बांधून काढले आहेत. कार्तिकेय स्वामी , विष्णू , दुर्गा अशा देवतांच्या मुर्त्या सुध्दा आहेत. सर्व भाग झाडून स्वच्छ असतो. महाशिवरात्री ला भाविकांची खूप गर्दी असते. 

मंदिरा च्या मागील बाजूस अर्ध्या एकरात पुष्करणी आहे. स्नानासाठी कठडे बांधले आहेत . परिसर एकदम स्वच्छ आहे. मी गेलो त्यावेळी पुष्करणी मधे भरपूर पाणी होते. पुष्करणी जवळ परकोटाचे एका बाजूस प्रचंड वटवृक्ष आहे. 

कार पार्किंग साठी मंदिरा बाहेर खूप मोठी जागा उपलब्ध करुन दिलेली आहे. पीठापूर मधे श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानात दर्शनासाठी आलेल्यांनी जरुर भीमेश्वर ला भेट द्यावी . पीठापूर वरुन कार नी साधारणतः अर्ध्या तासात या मंदिरापाशी पोहोचता येतं. 

रस्ता निसर्ग सौंदर्याने संपन्न आहे. नारळाचे वृक्ष भातशेतीच्या बांधावर हारीनी लावलेली दिसतात. भाताची शेती पाणथळ जागेत असल्यामुळे पांढरे बगळे ही खूप दिसतात. हिरव्या रंगाच्या विविध शेडस् पाहून डोळे निवतात. मन प्रसन्न करणारे वातावरण आहे. 

भारतवर्ष निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. आपल्या मुलाबाळांना अवश्य भारताच्या चार ही दिशांना घेऊन जा. त्यांना आपल्या सांस्कृतिक वारशाची ओळख होऊ द्या. 


अनिरुध्द कवीश्वर -

Wednesday, December 27, 2023

हरक्षण

 सुप्रभात 🙏🌹 , 


खरंतर वर्ष अखेरीस  अनुभव का मोजावा ?  हर क्षण  आयुष्य बदलत असते. प्रत्येक क्षण नवीन , जाणिवा समृध्द करणारा असतो. 

मन प्रसन्न असले की उत्साह द्विगुणित होतो. आपल्याला काय हवे आहे यापेक्षा आपण काय देऊ शकतो हा विचार एकदा मनात रुजला की इंद्रिये जोमाने कामाला लागतात. 

निसर्ग आपल्यापरीने सृष्टीला नवजीवन देत असतो. सूर्योदय , सूर्यास्ताच्या नित्यनूतन रंगछटा  दृष्टीसुख देतात . सागराच्या गाज , नद्यांचे खळखळाट करत वाहणारे पाणी , पक्षांची कुजबुज , गाईंचे हंबरणे असो की सिंहगर्जना , रंगीबेरंगी ताजी फुले  , सोनचाफा , मोगरा , सायली , अनंत , सोनटक्का शुभ्र रंगाची असली तरी त्यांचा सुगंधी दरवळ केवळ आनंद देतो. 

जसं देता आलं पाहिजे तसं स्वीकारता ही आलं पाहिजे. किती दिवस झाले निसर्ग लुटत असलेला हा आनंद घेऊन आठवून पहा म्हणजे आपण कोणत्या गोष्टींना मुकत आहोत याची जाणीव होईल.‌

पहाटे नदीकाठी पाण्यात पाय टाकून निवांत बसून पहा , झुंजूमुंजू होताना मंदिरातील घंटानाद ऐकून किती दिवस झाले ?  संध्याकाळी समुद्रकिनार्यावरील भन्नाट वार्यात मऊशार वाळूत अनवाणी फिरुन किती काळ लोटला ?    अंधारात लुकलुकणारे तारे कधीचे लक्ष वेधत आहेत कधी त्यांच्याकडे पाहिलं आठवतंय का ?  निळ्यासावळ्या आकाशाकडे मनसोक्त डोळे भरुन पाहिले का ?

जिथे तिथे हरक्षणी त्याचा  तो मोरपंखी स्पर्श आठवण करुन देतो . तो सदैव सोबत आहे. 

मनामनांत डोकावणारा... कृष्ण !!

ज्याचा त्याचा कृष्ण ज्याला त्याला भेटावा आणि ओळखता ही यावा. 🙏🌹

अनिरुध्द कवीश्वर -

बेमुर्वतपणे...

 बेमुर्वतपणे धबधब्यासारखे उड्या घेणे म्हणजे स्वैर जगणे . आपल्याच धुंदीत झुलणे. कधी अवखळपणे , कधी शांतपणे वाहणे  , मधेच थबकणे तर कधी डोहातले हळुच डहुळणे. 

मनानी मनाशी केलेला संवाद आपल्यालाच ऐकू येणारा . आत्ममग्नतेत तन्मय होणारा. स्वयंस्फूर्त !! संतुष्ट होण्यासाठी अविरत गुजबुज. 

कलंदर होणे सोपे नाही. बरेच काही मागे सोडून नित्य नव्यानं , कुतूहलानं स्वीकारण्याची मानसिकता धारण करणे ही पहिली पायरी. 

येईल त्याला सामोरे जात पाण्यासारखं कचरा किनारी फेकत खळाळत स्वच्छंदपणे काळाला आपल्या मागे धावायला लावणं.

जीवन जगण्याची परिभाषाच बदलून जाते.  इतरही केवळ आपल्या उत्साही पणाने उद्युक्त होतात. 

मन प्रसन्न करण्यासाठी सहज , स्वयंस्फूर्तीने वाटचाल करावी . त्यातला अनुपम आनंद  लुटावा. 

🙏🙏


अनिरुध्द कवीश्वर -

Monday, December 25, 2023

पृथ्वीचे दोहन

 पृथ्वीचे दोहन आणि शोधन ज्याप्रकारे होईल त्याचप्रकारे त्यांचे परिणाम होतील. पूर्व काळात गौ आणि गौदुग्धाचे दोहन आणि  कृषि उत्पादनाचे शोधन  होत होते. निसर्गाशी जवळीक साधून होत असल्यामुळे एकप्रकारचा समन्वय होता. त्यामुळे शांत , समाधानी जीवन होते. 


आजच्या काळामध्ये यंत्र आणि तंत्राचे दोहन , शोधन होते. त्यामुळे जीवन ही यंत्रवत् झाले आहे. 


याकरीता मानवी जीवनाचे उन्नयन कुठल्या मार्गांनी करायचे याचे विवेचन भगवद्गीतेत कृष्णानी सांगीतले. गीता म्हणजे उपनिषदांचे दोहन आणि मानवी जीवनाला पूर्णत्व आणण्याचे शोधन . 


यंत्र म्हणजे कर्मेंद्रियांचे एकप्रकारे एक्स्टेंशन. कोणत्याही काळात ज्ञानेंद्रिये मात्र तीच आहेत.  याकरीता कृष्णाचा उपदेश कालातीत आहे.


ज्याचा त्याचा कृष्ण ज्याला त्याला भेटावा आणि ओळखता ही यावा. 


अनिरुध्द कवीश्वर -

Wednesday, November 29, 2023

पैल तोगे काऊ कोकताहे...

 सुप्रभात 🙏 🌹 ,


मनांत एकाचवेळी दोन विचार जागृत होतात. यालाच द्वैत म्हणत असावेत. जेव्हा मन , शरीर आणि अंतरात्मा यांचे एकाच दिशेने प्रवर्तन होते त्याला अद्वैत संबोधत असावेत. 

विश्राम बेडेकर यांच्या आत्मचरित्राचे नांवच अत्यंत समर्पक " एक झाड दोन पक्षी " असं आहे. 

ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर रित्या द्वैत-अद्वैताची गोष्टी रुपाने मांडणी करतात. खालील ओवी पहा ...

पैल तो गे काऊ कोकताहे ।

शकुन गे माये सांगताहे ॥१॥

उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ ।

पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥

दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी ।

जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥३॥

दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी ।

सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥

आंबया डहाळी फळें चुंबी रसाळीं ।

आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥

ज्ञानदेव ह्मणे जाणिजे ये खुणें ।

भेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६॥


इथे त्यांनी ही एका पक्ष्याच्या , कावळ्याच्या कोकलण्यातून शुभशकून पाहिले . 

पंढरीनाथ घरी येणार हा तो शुभशकून !! तो महाराव घरी आल्यावर त्यांच्या मीलनांत सारे सारे द्वैत संपणार आहे. 

घर म्हणजे देह आणि कावळा म्हणजे मन . त्यांचे कोकलणे म्हणजे सतत मनात चाललेला घोषा . कोणाचा ? त्या माहेरच्या पंढरीनाथाचा. 

सारी रुपके फारच मनोभावे निवडली आहेत. आपल्यासमोर ठेवताना स्वतः च्या ही मनाला साद घालत आहेत. 

केवळ अप्रतिम !! अत्यंत तरल आणि माधुर्यपूर्ण. म्हणून म्हणतात ज्ञानेश्वरी ची एक तरी ओवी अनुभवावी. 

कृष्ण , ज्ञानेश्वर महाराजांना विट्ठल रुपात भेटला. तसा ज्याचा त्याचा कृष्ण ज्याला त्याला भेटावा आणि ओळखता ही यावा. 🙏🙏🌹


अनिरुध्द कवीश्वर -

Friday, November 24, 2023

ज्याचा त्याचा कृष्ण..

 सुप्रभात 🙏,


ज्याचा त्याचा कृष्ण..


खरंच अपेक्षारहित आपुलकी , आस्था मनाला शांत करते. 

मला विट्ठल फार आवडतो. ना हात आशीर्वाद देण्यासाठी ना काही घेण्यासाठी , देणं ना घेणं फक्तं कमरेवर हात ठेऊन प्रेमानी , वात्सल्यापोटी तो आपली वाट पहात असतो. 

टाळ - मृदंगाचा सुरेल नाद त्याला प्रसन्न करतो आणि त्याची प्रसन्नता आपल्याला आनंद देते. 

सर्व त्रिविध ताप विसरायला लावतो , भुलवतो , धुंद करतो असा तो मन-मोहन आहे. स्त्री पुरुष भेदरहित सर्वांचा तो सखा आहे. 

संत जनाबाई एका अभंगात म्हणते ..

"जनी सांगे सर्व लोकां । 

न्हांऊं घाली माझा सखा ॥४॥"

हे त्याचे न्हाऊ घालणे म्हणजे भक्तिरसात भिजवून जीवाची तगमग शांत करण्यासाठी केलेला प्रेमाचा वर्षाव . धन्य ते सर्व संत ज्यांना त्यांचा सखा सापडला. 

तसा ज्याला त्याला त्याचा कृष्ण सापडावा अन् ओळखता ही यावा. 🙏🌹

जय जय रामकृष्ण हरि 

जय जय रामकृष्ण हरि 


अनिरुध्द कवीश्वर -

Wednesday, November 22, 2023

केवल आनंद ...

 अधिक सूक्ष्मात जाऊन बोलायचं झालं तर .... 


शिवसूत्र सांगतात , शिवाने  संकल्पानुसार  एकटेपणा दूर व्हावा यासाठी स्पंदशक्तिद्वारे सृष्टीची निर्मिती केली. जी काही दृष्य , अदृष्य पण अस्तित्वात असलेली त्रिगुणात्मक सृष्टी आहे ती त्या शिवसंकल्पाचा आविष्कार आहे. 

या दृष्टीनं पहाता आपले अस्तित्वच त्या शिवाच्या परमोच्च आनंदासाठी आहे. मग आपले सुख-दु:ख , त्रास असो वा निखळ आनंद, प्रेमादि नवरसात्मक भावना किंबहूना आपले जगणे अथवा आपला मृत्यु सुध्दा त्याला आनंद देण्यासाठी आहे. हे एकदा मनात रुजवलं की रस भोगून ही अलिप्तता कशी असते त्याचा अनुभव येतो. 

ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायातील ही एक ओवी - 


‘तेणे कारणे मी बोलेन। 

बोलीं अरूपाचे रूप दावीन। अतींद्रिय परि भोगवीन। 

इंद्रिया करवी।।३६।।’


नेति नेति असे म्हणून त्या परब्रह्माचे वर्णन करण्यास असमर्थता वेद दर्शवतात . रुप नसलेल्या त्या अरुपाचे रुपसुध्दा मी वाणीद्वारे दाखवीन एवढंच नव्हे तर अतिंद्रीय मी इंद्रियांच्या द्वारे भोगवीन इतकं समर्पक आणि आत्मविश्वासाने ज्ञानेश्वरच सांगू जाणे. 

केवळ अलौकिक हृदयाला भिडणारी , रसपूर्ण अशी त्यांची एक तरी ओवी अनुभवावी 🙏🌹


अनिरुध्द कवीश्वर -

Friday, November 10, 2023

राहिले ओठआतल्या...

 सुप्रभात,


कधी कधी शब्द ओठातून बाहेर यायला नाराज असतात , कधी परिपूर्णतेला शब्दांची गरज भासत नाही , कधी भावनावेग अति तीव्र होतात अन् वाणी मूक होते . 


कधी वा रा कांत यांचे एक गीत आठवते ...

राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे 

राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे

भेट होती आपुली का ती खरी, कि स्वप्न माझे ?


कापले ते हात हाती बावरे डोळ्यात आसू

आग पाण्यातून पेटे जाळणारे गोड हासू

दोन थेंबांच्या क्षणांचे प्रीतीचे तकदीर माझे


गर्द हिर्वे पाचपाणी रक्तकमले कुंकुमाची

खेळताना बिंबलेली शुभ्र जोडीसार सांची

आठवे ? म्हटलेस ना तू ? हे हवेसे विश्व माझे


मी म्हणू कैसे, फुला रे, आज तू नाहीस येथे

वेळ दारी सावलीची रोज असुनी बार देते

लाख पुष्पे तोडिल्याविण ये भरोन पात्र माझे


मनाचा मनाशी होत असलेला संवाद उच्चारण्याची पात्रता वैखरीमधे असतेच असं नाही. पण कवींची प्रज्ञा तरल असते. त्यांच्या शब्दांमधे मनांत उमटलेले भाव प्रकट करण्याचे सामर्थ्य असते.

ज्याला डोळ्यांतले भाव वाचता येतात त्याला शब्दांची ही अडचण होते . हृदयाची स्पंदने अन् जाणिवांचे स्फुरण स्वयंपूर्ण असते. 

मन सदैव प्रेम आणि वात्सल्याच्या भावनांनी ओथंबलेले राहो. 

अनिरुद्ध कवीश्वर -

Thursday, November 9, 2023

संवाद

 सुप्रभात 🙏

दोन व्यक्ती जेव्हा संवाद साधतात तेव्हा अप्रत्यक्षरित्या आत्मिक तरंगांशी संलग्न होण्याचा प्रयत्न करतात. चार वाणी वैखरी , मध्यमा , पश्यंती आणि परा . 

यापैकी वैखरी वाणी तील ध्वनिकंपनांशी आपण परिचित आहोत. अक्षरं आणि शब्दांच्या उच्चारातून वैखरी वाणी प्रत्यक्ष रित्या आपण ऐकतो. 

मध्यमा वाणी म्हणजे अक्षरं आणि शब्द केवळ दृष्य स्वरुपात आपल्यासमोर आले तरी विचार प्रवर्तन होते. याचा ही  आपल्याला पुस्तकांच्या माध्यमातून परिचय असतो. 

पश्यंती वाणी मधून स्वतः चे स्वतः शी वैचारिक मंथन कायम सुरु असते . त्यातून देखिल विद्युत-चुंबकीय तरंग प्रसारित होत असतात. 

परावाणी ही विश्वचैतन्यात स्फुरणार्या  तरंग आणि तदानुषांगिक कंपनांशी चित्त जोडून घेते . 

विश्वचैतन्याची व्याप्ती अपरिमित आहे. त्यामुळे दोन व्यक्ती ज्यांचे विचारतरंग जुळतात त्या शारिरीक दृष्ट्या  एकमेकांपासून 

कितीही दूर असल्या तरी वास्तविक पहाता अगदी ह्रदयाला स्पर्श करीत असतात. 

आपले खरे आप्त तेच असतात हो की नाही?

अनिरुध्द कवीश्वर -

Saturday, November 4, 2023

ज्ञानेश्वरी मधील विज्ञान

 ज्ञानेश्वरी मधील विज्ञान...

आम्ही  आधी आमचे ग्रंथ अभ्यासले पाहिजेत . त्यावेळची शब्दावली ( Terminology  )वेगळी असली तरी आधुनिक वैज्ञानिक संकल्पनांशी नाते जोडणारी आहे. 

ज्ञानेश्वरी मधे अध्यात्म आणि वाड्:मय सौंदर्या बरोबर विज्ञान ही प्रतिपादिले आहे. 

अथवा नावें हन जो रिगे । 

तो थडियेचें रुख जातां देखे वेगें ।

तेचि साचोकारें जों पाहों लागे । तंव रुख म्हणे अचळ ॥९७॥

अथवा जो नावेत बसून जातो त्याला किनार्‍यावरची झाडे भरभर चालली आहेत असे दिसते. पण वस्तुस्थिती जेव्हा तो पाहू लागतो तेव्हा ती झाडे स्थिर आहेत असे तो म्हणतो. ॥९७॥

थिअरी ऑफ रिलेटीव्हिटी - आईन्स्टाईन

आणि उदोअस्तुचेनि प्रमाणें । 

जैसें न चालतां सूर्याचें चालणें ।

तैसें नैष्कर्म्यत्व जाणें । 

कर्मींचि असतां ॥९९॥

आणि सूर्य उदय व अस्त पावतो, या एका प्रमाणावरून तो चाललेला भासतो, पण वास्तविक तो चालत नाही, त्याप्रमाणे तो कर्माचरण करीत असताही आपले नैष्कर्म्य जाणतो. ॥९९॥

गॅलेलियो, कोपर्निकस यांच्या काही शतके अगोदर ज्ञानदेवांनी प्रतिपादिले आहे.

परी महाभूतें पोटीं वाहे । 

तेवींचि परमाणूमाजीं सामाये ।

या विश्वानुसार होये । 

गगन जैसें ॥ १६-१७३ ॥

जसे आकाश आपल्या पोटात (वायू वगैरे) महाभूतांस धारण करते परंतु त्याचप्रमाणे ते (आकाश) परमाणूमध्ये मावले जाते आणि जसे हे विश्व आहे तसे ते होते. ॥१६-१७३॥

क्वांटम् फिजीसिस्ट ( पूॅंज सिध्दांती ) यांच्या ही आधी ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले आहे. 

डॉ काप्रा म्हणतो , " In eastern Mysticism, Universal inter-woveness includes the observed and observer's consciousness; that is also the experience of atomic science. The Mystics and the scientist often arrive at similar conclusion, one from within and the other from outside ... " 

ज्ञानेश्वर महाराज यासंदर्भात त्यापुढे जाऊन सांगतात ब्रह्माच्या उपासनेत त्रिपुटीच्या संकल्पनेचा त्याग करावा लागतो. 

लक्ष लावुनि त्रिपुटी ठाण त्रिभंगी चोखडें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

निर्गुण ब्रह्माच्या उपासनेत ध्यान, ध्याता, व ध्येय या त्रिपुटीचा त्याग करावा लागतो. 

अनिरुध्द कवीश्वर-

संदर्भ: श्री ज्ञानेश्वरी-विज्ञान दर्शन

लेखक मुकुंद सदाशिव गोखले

Thursday, October 26, 2023

बंगली

 सुप्रभात 🙏🌹

मानवी मन हे किती स्वैर विचार करु शकते आणि स्वतः चं असं स्वतंत्र विश्व तयार करु शकते हे जाणवतं. 

वि द घाटे यांचं छोट्या छोट्या कथांचं एक सुंदर पुस्तक आहे. इंटर ला असताना आम्हाला अभ्यासाला होतं. त्यात एक फुलवेड्या माईंची कथा येते. मला  नेहमी त्या फुलवेड्या माईंची कथा आठवते. 

तुमच्या मालकीची एक सुंदर बंगली असावी .  मोठ्ठं आवार , शेणाने सडा घातलेलं अंगण असावं . त्यात फाटकाच्या. कमानीवर चमेलीचा वेल चढवलेला असावा. घरात शिरण्यासाठी छान छोटीशी शहाबादी फरसबंदी ज्याच्या आजूबाजूला मऊ गवत डोकावूं पाहतंय अशी पायवाट . 

अंगणाला बांबूच्या काठ्यांचे झाडांना मोकळीक आणि आधार देणारे कुंपण असावे. त्याच्या सभोवती जाई-जुई, मोगरा , सायली , अनंत , सोनटक्का, बटमोगरा , अबोली , गोकर्ण , कृष्णकमळ , भरगच्च गुच्छ लगडलेला वेली गुलाब असावा , रंगीत लिली , चिनी गुलाब , बहरलेला केशरी जास्वंद अशा झाडांची रेलचेल असावी. कवठीचाफ्यासाठी स्वतंत्र कोपरा राखलेला हवा. 

परसदारी पेरु , आंबा , सीताफळ, पपई ,शेवगा ,   अशी फळझाडे झाडांना आपले आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी खत-पाण्यानी मशागत केलेली असावी. 

पहाटे पक्षांची मंजूळ आवाजातली किलबिल , भारद्वाज पक्षाचे जोडीदारासह घुमणे, दुपारी चिमण्या आणि राघू यांचे थव्यांनी परसदारी दंगा करावा आणि संध्याकाळी कावळ्यांनी काव काव करत आंब्याच्या झाडावर वस्ती करावी. 

पडवीमधला पितळी कड्या असलेला  शिसवीचा    वामकुक्षी साठी आमंत्रण देणारा झोपाळा आपलीच वाट पहात थांबलेला असावा. 

अंगणातून नुकतीच खुडून आणलेली सुगंधी आणि रंगीत फुले वाहिलेली देवघरातील कृष्णाची एकच मनोहारी मुर्ती प्रेमभराने पहाताना मन प्रसन्न व्हावे . तुपाच्या मंद ज्योतीनी उजळून गेलेला देव्हारा , धूपाचा गंध , पूजेस्तव घंटीच्या नादाने वातावरण भारुन जावे. 

वासना आणि भावनांचा कल्लोळ रिचवणारं , एकांतवासात ही आनंद देणारं , आल्या गेल्याची आपुलकीनं वास्तपुस्त करणारं , समाधाना नी मन शांत करणारं , तृप्त करणारं , जीवन समृध्द करणारं असं तुमचं घर असावं ही परमेश्वर चरणी प्रार्थना. 🙏🌹


अनिरुध्द कवीश्वर -

Tuesday, October 24, 2023

Matter and Consciousness

 Matter and Consciousness 

The question of conventional western science Viz

" at what moment does consciousness originate from matter ? "

Is now turned upside down , namely

" How and when does consciousness produce the illusion of matter ? "

( श्री ज्ञानेश्वरी-विज्ञान दर्शन , लेखक मुकुंद सदाशिव गोखले ) 

You may call it a question of matter - antimatter which comes first. 

" हे नाही म्हणो जाईजे । तो विश्वाकारे देखिजे।

आणि विश्वचि ऐसे म्हणिजे। तरी हे माया ।।"

 संत ज्ञानेश्वर 

To me it interchanges within according to sankalpa in  chitt , which originates from pure spandshakti of Shiva . 

Hence to relate with , one must chant in manasa " तन्मे मन: शिवसंकल्पमस्तु " 🙏🌹

Kashmiri Shaivism , Shivasutra is far ahead of current scientific research . 

Aniruddha Kavishwar

Friday, October 20, 2023

समाजभान

 सुप्रभात 🙏

निसर्ग मानवांनी निर्माण केलेला कायदा जाणत नाही. नैसर्गिक उर्मी सहज आणि उपजत असतात. हार्मोन्स मधील बदल व्यक्तींमधे  वेगवेगळ्या वयात होतात. सर्वसाधारणपणे दहा ते १८ या कोणत्याही कालावधीत होऊ शकतात. 

मुलगा असो का मुलगी दोघांना ही अशा बदलांना , आकर्षणाच्या तीव्र उर्मींना कसे हाताळायचे याबाबतचे मार्गदर्शन देणे गरजेचे आहे. तसेच न सांभाळता आल्याने हिंस्त्र आविष्काराला बळी पडलेल्या मुलींना लोकनिंदे पासून वाचवणे आणि सहानुभूती पूर्वक समजून घेण्याची गरज आहे. 

मुलांना लैंगिक शिक्षणाबरोबरच मुलींच्या लैंगिक इच्छेबाबत स्वनिर्णयाचा आदर करणे शिकवल्या गेले पाहिजे.

As a prudent and culturally evolved person one must have respect towards emotions of everyone.

This can reduce the percentage of unnatural events but can't eradicate . विचारांनी आणि वृत्तीने उन्नत होण्याची प्रक्रिया प्रत्येक व्यक्ती मधे वेगवेगळ्या वयात होते. परंतु समाजात सर्व एकत्र रहात असल्याने संघर्ष हा होणारच. 

याकरिता कर्मांचा सिध्दांत उपयोगी होऊ शकतो. गुंड प्रवृत्ती आणि हिंस्त्र व्यवहार यांचे दृष्य परिणाम कधी दिसतात कधी प्रत्यक्ष दिसत नसले तरी होतातच हे नक्की. कारण त्रास देणाऱ्या व्यक्तींना होणारे मानसिक पातळीवरील त्रास दिसत नाहीत. 

मूलभूत शिक्षण हे व्यक्तीला लिंगभेदारहित शारिरीक रित्या सुदृढ आणि मानसिकदृष्ट्या आत्मविश्वास जागृत करणारे असावे. 

अनिरुध्द कवीश्वर -

Sunday, October 15, 2023

मानस आयुर्वेद

 सुप्रभात 🙏 🌹


अल्बर्ट एलिस हा REBT ( Rational Emotive Behavioural Therapy )चा प्रणेता मानला जातो. " मी अल्बर्ट एलिस" हे त्याचे आत्मचरित्र वाचलं आहे. 

वयाच्या वेगवेगळ्या कालखंडात प्रत्येक व्यक्ती का तसं वागते त्यावर त्यानी कारणमीमांसा दिली आहे. 

जगभरात क्लिनिकल सायकॉलॉजी साठी त्याची थेरपी उपयोगात आणली जाते. 

त्याच्या आयुष्याचा शेवट मात्र फार मार्मिक आहे . तो वाचण्यासारखा , विचार करण्यासारखा आहे. 

आपल्याकडे विदर्भात गुलाबराव महाराज नावाचे एक अंध संत होऊन गेले. त्यांनी विविध विषयांवर १३५ ग्रंथ लिहिले. त्या ग्रंथरचना वर नागपूरचे श्री घटाटे यांनी पीएच् डी घेतली. 

या गुलाबराव महाराजांचे भारतीय मानसशास्त्रा वर आधारित एक पुस्तक आहे. " मानस आयुर्वेद " यात मांडलेली विचारसंपदा अधिक समृध्द आहे.

आपल्या संतांनी सामान्य लोकांसाठी ज्या गोष्टी लिहून ठेवल्या त्यांचे मार्केटिंग नाही केले. सार्वजनिक हिताच्या गोष्टींचे मार्केटिंग ही संकल्पना आपल्याकडे रुजली नाही. 

🙏🏻🙏🏻

अनिरुध्द कवीश्वर -

Sunday, October 8, 2023

जीवन जगण्याची कला

 जीवन जगण्याची कला


 कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचे यासाठी चिंतन संतांनी केले आणि सोपे करुन सांगीतले .

प्रत्येक क्षण नूतन , त्याचा अनुभव नूतन . क्षणोक्षणी बदलणार्या भावभावनांच्या खेळात माणूस स्वतः लाच हरवून बसतो. मन दु:खी असलं की असं वाटतं हे चक्र कधी थांबेल अन् मन प्रसन्न असलं की वाटतं काळ इथेच थांबावा. 

सततचे मानसिक आंदोलन , परिस्थिती चा रेटा , त्रास नकोसा होतो. त्याचा परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे ही मन खंतावते. यावर उत्तम उपाय म्हणजे आपल्या आवडीच्या गोष्टी करत रहाणे. कधी जमतं कधी नाही . 

तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे

" मन करा रे प्रसन्न 

सर्व सुखाचे कारण " 

आयुष्यातले आनंदी क्षण वेचणे आणि चुका आपल्या असो का इतरांच्या माफ करुन वाटचाल करणे म्हणजे मनाला मुक्त करणे.

त्याचे अवीट प्रेम आणि तो कृष्ण माझा सखा आहे. हे मनांत पक्के असू द्यावे. 

कोणी मनुष्य , नातेवाईक , कोणी स्वार्थ वागविणारा आपण जवळचा मानला तरी भ्रमनिरास होऊ शकतो. पण कृष्ण मात्र प्रेमळ आणि प्रत्येकाचे विश्रांती स्थळ आहे.

ज्यांचा त्याचा कृष्ण ज्याला त्याला भेटावा आणि ओळखता यावा. 

अनिरुध्द कवीश्वर -

Monday, October 2, 2023

उदरभरण नोहे .....

 उदरभरण नोहे .....


आपल्याकडे जेवायला बसायची पण एक पध्दत आहे. ताटामधे अन्न वाढायची एक शिस्त आहे. पंगतीमधे सर्वांच्या  ताटामधे पूर्ण वाढप झाल्याशिवाय ताटातल्या अन्नाला शिवत नाहीत. संयम ठेवावा लागतो. अन्नाच्या सुगंधानी पाचनासाठी आवश्यक लाळ तयार होणे असते . ते आपसूकच साधल्या जाते.


ताट पूर्ण वाढून झाल्यावर ही सर्वांनी एकमुखाने प्रार्थना पूर्वक खालील श्लोक म्हणायची पध्दत आहे. 


" वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे।

सहज हवन होते नाम घेता फुकाचे।

जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ।।


अन्नभक्षण यज्ञकर्म आहे हे जाणून सेवन करायची रीत आहे. सद्गुरू म्हणतात त्याप्रमाणे हे शिजवलेले अन्न या स्वरुपात आपल्यापर्यंत  पोहोचवण्या साठी ज्यांचा ज्यांचा हातभार लागला त्या  सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा उद्देश आहे. 


भगवंत गीतेमधून आपल्या अस्तित्वाचे वर्णन करुन सांगताना म्हणतात


" अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः।

प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्।।१५.१४।।


प्रत्येक प्राणीमात्राच्या शरीरात मी जठराग्नी च्या स्वरुपात राहून प्राण , अपान , समान , उदान , व्यान या वायुंच्या सहाय्याने सर्व अन्नाचे पाचन करतो. 


थोडक्यात आपण जेवतो ते आपल्या देहातील ईश्वराला आहुती म्हणून अर्पण करीत असतो. तो अग्निस्वरुप आहे म्हणून ते यज्ञकर्म . 


जे अन्न आपण सेवन करु त्यापासूनच शरीर पुष्ट होते असते. यास्तव आपल्याकडे अन्न शिजवण्यापासून ग्रहण करेपर्यंत शुचिता , स्वच्छता पाळण्याची परंपरा आहे. आपण या यज्ञात जी आहुती देऊ त्याचे फळ आपल्याला मिळणार आहे याची जाणिव ठेवली पाहिजे. 


आद्य शंकराचार्यांनी रचलेल्या अन्नपूर्णा स्तोत्र आहे या यज्ञकर्माचे काय फळ मागीतले आहे पहा ...


अन्नपूर्णे सदापूर्णे शङ्करप्राणवल्लभे ।

ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वति ॥११॥


आपल्याकडे प्रत्येक कार्याला ईश्वराचे अधिष्ठान असावे अशी प्रार्थना केली गेली आहे. 


आसनमांडी घालून जेवायला बसण्यामागचा उद्देश ही आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न सेवन करु नये असाच आहे. सावकाश जेवणे म्हणजे पोटात अवकाश , थोडी जागा शिल्लक राहिल एवढंच जेवणे अपेक्षित आहे. 


अन्न धान्य पिकवणार्या शेतकर्यांविषयी, स्वयंपाक करणार्या हातांविषयी कृतज्ञता आणि आदर व्यक्त करणे सुसंस्कृतपणा चे लक्षण आहे. 


अनिरुध्द कवीश्वर -

Thursday, September 28, 2023

सर्जन-विसर्जन

 सुप्रभात 🙏,


पार्थिव मुर्ती वर इतका जीव जडतो अन् दहा दिवसांत देखण्या रुपाचा लळा लागतो. जे जे म्हणून सुंदर आणि उदात्त आहे त्याची आस मनांत रुजते. 

प्रत्येक सर्जनाचे विसर्जन होत असते हे माहित असूनसुध्दा मन कातर होते. बहिणाबाई उगाच म्हणत नाहीत.

" मन वढाय वढाय ... " 

क्षणभंगूर जीवनात देखिल आनंद भरुन जगता येतं अन् तितक्याच सहजतेनी देह सोडून चैतन्यात विलीन होता येतं अशी शिकवण देणारा तो सुखकर्ता - दु:खहर्ता आहे. 🙏🏻🙏🏻🌹


अनिरुध्द कवीश्वर -

Tuesday, September 26, 2023

ऋतुचक्र

 सुप्रभात 🙏 🌹

सुदर्शनचक्र म्हणा , ऋतुचक्र म्हणा , रथचक्र म्हणा चक्र हे प्रगतिचे आणि गतिचे द्योतक मानले गेले आहे. 

चंद्र स्वतः भोवती पृथ्वीभोवती , सूर्याभोवती , पृथ्वी स्वतःभोवती आणि सूर्याभोवती, सूर्य स्वतः  भोवती अन् ग्रहमंडळासह दूधगंगेच्या आसाभोवती चक्राकार फिरत आहे. 

हे  सर्व तारामंडल , ग्रहमंडल , उपग्रहमंडल आणि धूमकेतूंसह दूधगंगा  स्वतः भोवती चक्राकार फिरत आहे. 

दूधगंगेसह सर्व भोवर्यासारखे आवर्त घेऊन ऊर्ध्वगामी  गतिमय तसेच स्पंदनशील आहे . 

या सर्वाची मूल प्रेरणा शिवाची स्पंदशक्ती आहे. स्पंदने हा या स्पंदशक्तीचा परिणाम आहे. 

या स्पंदनामुळे जो नाद निर्माण होतो तो आद्य नाद म्हणजे ॐकार . शिवाच्या डमरु वादनातून निर्माण झालेल्या वेगवेगळ्या लयींमुळे ध्वनी अन् आकार ऋषिंच्या मनात उमटले ती अक्षरे. त्यातून शब्द , भाव , दृष्य दृगोच्चर झाले. म्हणून आपल्या सृष्टीला शब्दसृष्टी संबोधल्या गेले आहे. विचार शब्दांशिवाय प्रकट होत नाहीत. 


अनिरुद्ध कवीश्वर

रांगोळी एक ऊर्जा देणारी कला...

 रांगोळी एक ऊर्जा देणारी कला...

पहाटे पहाटे सडा टाकून दक्षिणेत अजून ही घरासमोर छान वैशिष्ट्य पूर्ण पारंपारिक रांगोळ्या काढल्या जातात. 

रांगोळी चा उगम मंडला पासून झाला. आकाशस्थ ग्रह तारे यांचेशी पूजा पध्दतीच्या आधारे संपर्क साधण्याचे  शास्त्र म्हणून मंडलांची निर्मिती झाली. 

पारंपारिक रांगोळ्या या त्या मंडलांचेच स्थूल स्वरुप आहे. सृष्टीच्या निर्मितीशी , वैश्विक उर्जेशी संबंध जोडणार्या  पारंपारिक रांगोळ्या शुभचिन्हे समजल्या जातात. 

सर्जनशीलतेला आवाहन करणार्या रांगोळ्या घर-अंगणाचा परिसर आणि मनाला प्रसन्न करणार्या असतात. 

मातीचे अंगण शेणानी सारवून त्यावर तांदळाची पिठी ओली करुन विविध आकाराची पारंपारिक रांगोळी काढली की त्यातील सौंदर्य मनाला आनंद देते. 

दिवसाची सुरुवातच मंगलाचरणानी आणि सुंदर रांगोळ्यांनी केली की दिवसभराची ऊर्जा प्राप्त होते.


अनिरुद्ध कवीश्वर -

Evolvement

 पतंजली योगशास्त्र...

पतंजली योगशास्त्र म्हणजे निरोगी जीवन जगण्याची कला आहे. शरीर आणि मन यांचा समन्वय कसा साधावा यांची सूत्रे सांगीतली आहेत. त्याला एक सिक्वेन्स आहे. 

यम - नियम साध्य केल्यावर आसन स्थिर होते. स्थिर सुखासनात प्राणायाम उत्तम साधतो . त्यात सातत्य असले की धारणा , म्हणजे मानसिक  प्रसन्नता राहण्यासाठी असलेल्या संकल्पना पक्क्या होतात. आसन स्थिर झाले आणि धारणा रुजल्या की ध्यानावस्था लवकर साधते . ध्यानाची अनिर्वचनीय सूप्त शक्ती म्हणजे समाधि अवस्था. 

अध्यात्मामधे शॉर्टकट नाहीत. मन निर्मळ होणे , स्वतः शी प्रामाणिक असणे महत्वाचे . 

सद्गुरूंना , कुलदेवतेला , आराध्य देवतेला नम्रपणे विनंती करुन सहाय्य मागणे यात कुठलाही कमीपणा नाही. आपल्या मनातील तगमग , शंका-कुशंकांचे आपोआप निरसन होत रहाते. 

जन्म हा एकप्रकारचा मृत्यु अन् मृत्यु हा एक प्रकारे नवा जन्म होय. घडते ते फक्त " स्थित्यंतर " . 

It's continuous process of evolvement from one state to another as well as one phase to another. It is happening every moment without any break.


अनिरुद्ध कवीश्वर -

संवाद मनाशी

 स्वतः शी स्वतः चा संवाद...

गुरुपाशी केवळ शारण्यभाव असावा हे आपल्या मनावर सतत बिंबवले गेले आहे. तसा गुरु  सापडणे आजच्या काळात दुर्मिळ, कठीण आहे पण अशक्य नाही. गुरु ला शोधण्याची गरज नाही. तेच तुम्हाला शोधतात. भारतात अव्याहतपणे सद्गुरू परंपरा चालत आली आहे जी विशिष्ट पातळीवर आत्मज्ञाना ची प्रत्यक्ष अनुभूती घडवणयास सहाय्यभूत ठरते . 

आपल्या महाराष्ट्राचे दैवत असलेला विट्ठल दोन्ही हात कमरेवर ठेवून आहे. देणे - घेणे असा व्यवहार नाही. 

आजच्या काळात पुस्तके हेच गुरु असे बर्याच लोकांना वाटते.  शिख धर्मामधे " गुरु ग्रंथ साहिब" या त्यांच्या धार्मिक ग्रंथालाच गुरु संबोधले आहे. यात संत नामदेवांच्या ही रचना आहेत. 

वैचारिक क्षमता वाढवण्यासाठी , मन मोठे करण्यासाठी , माहिती मिळण्यासाठी पुस्तके साथ देतात . 

एका पुस्तकाचे नांवच खूप काही सांगून जाते. 

" पावलापुरता प्रकाश " 

आपण समजूती च्या , जाणिवांच्या ज्या स्तरावर असतो त्याच्या पुढे फक्त एका पाऊलपुरता प्रकाश पडतो. जो दिशेचे मार्गदर्शन करतो. 

आत्मभान आणणारे ज्ञान आपोआप अंतर्मनात प्रकाशते त्यावेळी मन निर्विकल्प एकतानता साधते. अन् निसर्गाशी एकरुप होणे सहजक्रिया होते.  

तुकाराम महाराज म्हणतात तसे -

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें ।

पक्षी ही सुस्वरें आळविती ।।

येणें सुखें रुचे एकांताचा वास ।

नाही गुण दोष अंगा येत ।।

आकाश मंडप पृथुवी आसन ।

रमे तेथें मन क्रीडा करी ।।

कंथाकुमंडलु देहउपचारा ।

जाणवितो वारा अवसरु ।।

हरिकथा भोजन परवडी विस्तार ।

करोनि प्रकार सेवूं रुची ।।

तुका म्हणे होय मनासी संवाद ।

आपुला चि वाद आपणांसी ।।

-संत तुकाराम

हा आपल्या मनाशी होणारा संवाद फार महत्वाचा आहे.


मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः । बन्धाय विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं स्मृतम् ॥ अमृतबिंदूउपनिषद ll२ll 


मन हेच मनुष्याला बंधनात टाकण्यास अथवा मुक्त करण्यास कारणीभूत आहे. 



अनिरुद्ध कवीश्वर -

आज द्रौपदी फिर...

 आज द्रौपदी फिर आक्रोश कर रही है लेकीन आज कृष्ण नहीं है l


द्रौपदी च्या सूडाच्या ज्वाळात संपूर्ण कौरव - पांडव अन् अनंत वीर भस्मसात झाले . निष्पन्न महाभारतात केवळ राखरांगोळी . 


सीतेला रावणाने कपटाने पळविले तेव्हा रामाने पिच्छा पूरवून रावणाचा वध केला अन् सोडवून आणले. लंका हनुमानानेच भस्मसात केली.

आज राम नहीं है l


आता मणिपूरच्या अग्निकल्लोळामधे अजून किती आहुती पडतील भगवान जाणे. 


युध्द कोई भी हो दोनो पक्ष में जलती तो स्त्री ही है l आदिवासी हो या क्षात्राणी हो या ब्राह्मणी हो !! 


आज रावण मरकर मी जिंदा है दूर्योधन की लालसा लसलस करते जिवीत है l द्रौपदी अब भी लांछित होती है l महाभारत आज भी चेतना जाग्रत करने वाला काव्य है l बडा दु:खदायी मंजर है l 


विकृतता प्रकृती का रुप लेकर सजी है और प्रकृती सब कुछ गव्हर्नमेंट करेगी आस लगाए बैठे है l जैसे शासन कोई जिन्न है l 


कारणे काहीही असोत, जे काही मणिपूर मधे चाललंय ते मनाला उद्विग्न करणारे आहे. भयभीत करणारे आहे. जीवाचा संताप संताप करणारे आहे.


अनिरुद्ध कवीश्वर -

वाणी

 सुप्रभात,


कधी कधी शब्द ओठातून बाहेर यायला नाराज असतात , कधी परिपूर्णतेला शब्दांची गरज भासत नाही , कधी भावनावेग अति तीव्र होतात अन् वाणी मूक होते . 


कधी वा रा कांत यांचे एक गीत आठवते ...


राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे 


राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे

भेट होती आपुली का ती खरी, कि स्वप्न माझे ?


कापले ते हात हाती बावरे डोळ्यात आसू

आग पाण्यातून पेटे जाळणारे गोड हासू

दोन थेंबांच्या क्षणांचे प्रीतीचे तकदीर माझे


गर्द हिर्वे पाचपाणी रक्तकमले कुंकुमाची

खेळताना बिंबलेली शुभ्र जोडीसार सांची

आठवे ? म्हटलेस ना तू ? हे हवेसे विश्व माझे


मी म्हणू कैसे, फुला रे, आज तू नाहीस येथे

वेळ दारी सावलीची रोज असुनी बार देते

लाख पुष्पे तोडिल्याविण ये भरोन पात्र माझे


मनाचा मनाशी होत असलेला संवाद उच्चारण्याची पात्रता वैखरीमधे असतेच असं नाही. पण कवींची प्रज्ञा तरल असते. त्यांच्या शब्दांमधे मनांत उमटलेले भाव प्रकट करण्याचे सामर्थ्य असते.


ज्याला डोळ्यांतले भाव वाचता येतात त्याला शब्दांची ही अडचण होते . हृदयाची स्पंदने अन् जाणिवांचे स्फुरण स्वयंपूर्ण असते. 


मन सदैव प्रेम आणि वात्सल्याच्या भावनांनी ओथंबलेले राहो. 


अनिरुद्ध कवीश्वर -

 मन तरंग ...


कधी कधी अपेक्षाभंग , त्यानुषंगाने होणारी चिडचिड , मनाला आलेली मरगळ , कोरडी भावनांची गुंतावळ , अस्वस्थता , बेचैनी , दुनियादारी चा पोखरत रहाणारा भुंगा आणि अकारण आलेला थकवा ...

कोषात जाणे चांगले असे वाटू लागते. 


आपण सुखद अनुभूतींपेक्षा डागण्या देणार्या विचारांना कुरवाळत रहातो. अजून अजून अगतिकता जवळ करतो. निराशा आळवत रहातो. नकळत आपण एकलकोंडेपणा च्या आहारी जात आहोत हे समजत नाही.


आत्मिक समाधान आणि आनंद देणारा , मन प्रसन्न करणारा वेळ तेवढाच आपला स्वतः साठी जगल्याचा काळ . हा कॅनव्हास मोठा करणं आपल्याच हाती आहे. 


जीवन सुंदर आहे. जाणिवा विकसित करुन उपभोग घेता येतो. सौंदर्यानुभूती मनाची एक उच्च , तरल , शुभदायिनी  अवस्था आहे. 


अनिरुद्ध कवीश्वर -

ईश्वरेच्छा

 Good morning and have a wonderful day ahead 👍


I don't know who said it... "Knowing when to leave is important. The party , the job , the relationship."


जीवनामध्ये मोह , काम , क्रोध या गोष्टी शेवटपर्यंत जाता जात नाहीत. मन विचलीत करतात. 


त्यातही कामवासना फार प्रबळ किती ही नाही म्हटलं तरी बीजरुपानी शिल्लक असतेच. शरीराची साथ मिळो अथवा न मिळो धुगधुगी रहाते . भिन्नलिंगी व्यक्तींमधे आकर्षण ही निसर्गाची योजना आहे. मानसिक त्रास हा कामेच्छेचा आपण सहज स्वीकार न केल्याने होतो. 


शुचितेच्या कल्पनांचं ओझं वाहणं जमत नाही आणि टाकणं त्याहून कठीण. त्याच अनुषंगाने क्रोध त्याबरोबर आलेली अगतिकता ही मनाला कुरतडत रहाते. 


आपल्या मनाप्रमाणे गोष्टी न घडणं ह्याचा दोष आपण इतरांवर किंवा स्वतः वर लादतो. मनस्ताप करुन घेतो. आपण एकप्रकारे आपल्या अंतरात्म्याला दुर्ल़क्षीत करुन नको त्या विचारांना कवटाळून बसतो . ना घर का ना घाट का अशी आपली अवस्था आपणच करुन घेतो. 


त्यापेक्षा कर्तेपणा स्वतः कडे न घेता जे घडतंय त्यात ईश्वरेच्छा मानून प्रसाद स्वरुप स्वीकारणं यात समाधान आहे.


अनिरुध्द कवीश्वर -

तुम्हारा इंतजार हैं...

 सुप्रभात ,


वास्तविक जगाला विसरुन अनुभूती च्या उच्च स्तरावर तरंगत ठेवणारे शब्द अन् हेमंतदांचा मखमली स्वर... 


खूपदा अशी जुनी गाणी ऐकता ऐकता हवीहवीशी तंद्री लागते . 


हे नितांत सुंदर गाणे आणि त्यातील मृदुभाव उलगडून दाखवणारं रसग्रहण फार भावले मनाला . ज्यांनी कोणी केलंय त्याला धन्यवाद 🙏


अनिरुध्द कवीश्वर -

..............................................


*तुम पुकार लो*......


एखादा मोती हळूच घरंगळवा असे हमिंग.... अन् शुरुआत..आणि ..

हेमंत दा चा आवाज .

 हा आवाज ऐकायचा असेल तर मस्त ..निवांत..शांत रात्र हवी..प्रेयसी ची आठवणी च्या तरल अवस्थेत जायचे असेल .,तर हेमंत दा चे हे सृजन  शांततेत ऐका..


तुम पुकार लो..

तुम्हारा इंतजार है

तुम पुकार लो..


ख्वाब चुन रही है रात बेक़रार है

तुम्हारा इंतजार है

तुम पुकार लो...


. ...कुठेतरी नदीच्या काठावरतून पल्याड घेऊन जाणारे हे गाणे...चांदण्यात नाहलेली ही एक शांत रात्र...मनात प्रेयसी ची आठवण..

तिने यावं,तिची साथ हवी..तिची साद हवी आहे..कैक रात्र जणु होठा वर सांभाळून ठेवलेले काही एक जे तिला सांगायचे आहे ...एक आर्त स्वरात ..


होंठ पे लिए हुए

दिल की बात हम,..

जागते रहेंगे और

कितनी रात हम..

होंठ पे लिए हुए

दिल की बात हम

जागते रहेंगे और

कितनी रात हम...


प्रेमात पडावे तर असे...कोणासाठी झुरावे तर असे....ती सुगंधी जखम अनुभवावी..तो सल गोंजारावा..तिची आठवण अंगावरून झिरपू द्यावी तर अशी,जशी चांदणे झिरपते आहे जणु..एक एवढीच शी छोटी गोष्ट आहे...की,


मुक़तसर सी बात है

तुम से प्यार है

तुम्हारा इंतजार है

तुम पुकार लो..


   हे गाणे ऐकताना ही शहारा येतो... नखशिखांत एक लहर धाऊन जाते..इतके नाजूक अलवार प्रेम...ह्या प्रेमाला कशाचाही स्पर्श नाही...असे,.


"दिल बेहल तो जाएगा इस ख़याल से

हाल मिल गया तुम्हारा अपने हाल से

रात ये करार की बेक़रार है

तुम्हारा इंतज़ार है


ही अनावर ओढ,एक बेईचेनी....बाहेर पाऊस येण्याच्या अगोदर जे धुके येत आहे त्याचा सारखे..ह्या धुक्याची ओढणी करून पांघरून घ्यावे..आणि क्षितिजाच्या पार हळूच चालत निघावे..

नकळत ह्या गाण्याला मनानी दिलेली दाद च...अशी. वाह हेमंत दा ..वाह गुलज़ार जी..!!