Thursday, October 26, 2023

बंगली

 सुप्रभात 🙏🌹

मानवी मन हे किती स्वैर विचार करु शकते आणि स्वतः चं असं स्वतंत्र विश्व तयार करु शकते हे जाणवतं. 

वि द घाटे यांचं छोट्या छोट्या कथांचं एक सुंदर पुस्तक आहे. इंटर ला असताना आम्हाला अभ्यासाला होतं. त्यात एक फुलवेड्या माईंची कथा येते. मला  नेहमी त्या फुलवेड्या माईंची कथा आठवते. 

तुमच्या मालकीची एक सुंदर बंगली असावी .  मोठ्ठं आवार , शेणाने सडा घातलेलं अंगण असावं . त्यात फाटकाच्या. कमानीवर चमेलीचा वेल चढवलेला असावा. घरात शिरण्यासाठी छान छोटीशी शहाबादी फरसबंदी ज्याच्या आजूबाजूला मऊ गवत डोकावूं पाहतंय अशी पायवाट . 

अंगणाला बांबूच्या काठ्यांचे झाडांना मोकळीक आणि आधार देणारे कुंपण असावे. त्याच्या सभोवती जाई-जुई, मोगरा , सायली , अनंत , सोनटक्का, बटमोगरा , अबोली , गोकर्ण , कृष्णकमळ , भरगच्च गुच्छ लगडलेला वेली गुलाब असावा , रंगीत लिली , चिनी गुलाब , बहरलेला केशरी जास्वंद अशा झाडांची रेलचेल असावी. कवठीचाफ्यासाठी स्वतंत्र कोपरा राखलेला हवा. 

परसदारी पेरु , आंबा , सीताफळ, पपई ,शेवगा ,   अशी फळझाडे झाडांना आपले आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी खत-पाण्यानी मशागत केलेली असावी. 

पहाटे पक्षांची मंजूळ आवाजातली किलबिल , भारद्वाज पक्षाचे जोडीदारासह घुमणे, दुपारी चिमण्या आणि राघू यांचे थव्यांनी परसदारी दंगा करावा आणि संध्याकाळी कावळ्यांनी काव काव करत आंब्याच्या झाडावर वस्ती करावी. 

पडवीमधला पितळी कड्या असलेला  शिसवीचा    वामकुक्षी साठी आमंत्रण देणारा झोपाळा आपलीच वाट पहात थांबलेला असावा. 

अंगणातून नुकतीच खुडून आणलेली सुगंधी आणि रंगीत फुले वाहिलेली देवघरातील कृष्णाची एकच मनोहारी मुर्ती प्रेमभराने पहाताना मन प्रसन्न व्हावे . तुपाच्या मंद ज्योतीनी उजळून गेलेला देव्हारा , धूपाचा गंध , पूजेस्तव घंटीच्या नादाने वातावरण भारुन जावे. 

वासना आणि भावनांचा कल्लोळ रिचवणारं , एकांतवासात ही आनंद देणारं , आल्या गेल्याची आपुलकीनं वास्तपुस्त करणारं , समाधाना नी मन शांत करणारं , तृप्त करणारं , जीवन समृध्द करणारं असं तुमचं घर असावं ही परमेश्वर चरणी प्रार्थना. 🙏🌹


अनिरुध्द कवीश्वर -

Tuesday, October 24, 2023

Matter and Consciousness

 Matter and Consciousness 

The question of conventional western science Viz

" at what moment does consciousness originate from matter ? "

Is now turned upside down , namely

" How and when does consciousness produce the illusion of matter ? "

( श्री ज्ञानेश्वरी-विज्ञान दर्शन , लेखक मुकुंद सदाशिव गोखले ) 

You may call it a question of matter - antimatter which comes first. 

" हे नाही म्हणो जाईजे । तो विश्वाकारे देखिजे।

आणि विश्वचि ऐसे म्हणिजे। तरी हे माया ।।"

 संत ज्ञानेश्वर 

To me it interchanges within according to sankalpa in  chitt , which originates from pure spandshakti of Shiva . 

Hence to relate with , one must chant in manasa " तन्मे मन: शिवसंकल्पमस्तु " 🙏🌹

Kashmiri Shaivism , Shivasutra is far ahead of current scientific research . 

Aniruddha Kavishwar

Friday, October 20, 2023

समाजभान

 सुप्रभात 🙏

निसर्ग मानवांनी निर्माण केलेला कायदा जाणत नाही. नैसर्गिक उर्मी सहज आणि उपजत असतात. हार्मोन्स मधील बदल व्यक्तींमधे  वेगवेगळ्या वयात होतात. सर्वसाधारणपणे दहा ते १८ या कोणत्याही कालावधीत होऊ शकतात. 

मुलगा असो का मुलगी दोघांना ही अशा बदलांना , आकर्षणाच्या तीव्र उर्मींना कसे हाताळायचे याबाबतचे मार्गदर्शन देणे गरजेचे आहे. तसेच न सांभाळता आल्याने हिंस्त्र आविष्काराला बळी पडलेल्या मुलींना लोकनिंदे पासून वाचवणे आणि सहानुभूती पूर्वक समजून घेण्याची गरज आहे. 

मुलांना लैंगिक शिक्षणाबरोबरच मुलींच्या लैंगिक इच्छेबाबत स्वनिर्णयाचा आदर करणे शिकवल्या गेले पाहिजे.

As a prudent and culturally evolved person one must have respect towards emotions of everyone.

This can reduce the percentage of unnatural events but can't eradicate . विचारांनी आणि वृत्तीने उन्नत होण्याची प्रक्रिया प्रत्येक व्यक्ती मधे वेगवेगळ्या वयात होते. परंतु समाजात सर्व एकत्र रहात असल्याने संघर्ष हा होणारच. 

याकरिता कर्मांचा सिध्दांत उपयोगी होऊ शकतो. गुंड प्रवृत्ती आणि हिंस्त्र व्यवहार यांचे दृष्य परिणाम कधी दिसतात कधी प्रत्यक्ष दिसत नसले तरी होतातच हे नक्की. कारण त्रास देणाऱ्या व्यक्तींना होणारे मानसिक पातळीवरील त्रास दिसत नाहीत. 

मूलभूत शिक्षण हे व्यक्तीला लिंगभेदारहित शारिरीक रित्या सुदृढ आणि मानसिकदृष्ट्या आत्मविश्वास जागृत करणारे असावे. 

अनिरुध्द कवीश्वर -

Sunday, October 15, 2023

मानस आयुर्वेद

 सुप्रभात 🙏 🌹


अल्बर्ट एलिस हा REBT ( Rational Emotive Behavioural Therapy )चा प्रणेता मानला जातो. " मी अल्बर्ट एलिस" हे त्याचे आत्मचरित्र वाचलं आहे. 

वयाच्या वेगवेगळ्या कालखंडात प्रत्येक व्यक्ती का तसं वागते त्यावर त्यानी कारणमीमांसा दिली आहे. 

जगभरात क्लिनिकल सायकॉलॉजी साठी त्याची थेरपी उपयोगात आणली जाते. 

त्याच्या आयुष्याचा शेवट मात्र फार मार्मिक आहे . तो वाचण्यासारखा , विचार करण्यासारखा आहे. 

आपल्याकडे विदर्भात गुलाबराव महाराज नावाचे एक अंध संत होऊन गेले. त्यांनी विविध विषयांवर १३५ ग्रंथ लिहिले. त्या ग्रंथरचना वर नागपूरचे श्री घटाटे यांनी पीएच् डी घेतली. 

या गुलाबराव महाराजांचे भारतीय मानसशास्त्रा वर आधारित एक पुस्तक आहे. " मानस आयुर्वेद " यात मांडलेली विचारसंपदा अधिक समृध्द आहे.

आपल्या संतांनी सामान्य लोकांसाठी ज्या गोष्टी लिहून ठेवल्या त्यांचे मार्केटिंग नाही केले. सार्वजनिक हिताच्या गोष्टींचे मार्केटिंग ही संकल्पना आपल्याकडे रुजली नाही. 

🙏🏻🙏🏻

अनिरुध्द कवीश्वर -

Sunday, October 8, 2023

जीवन जगण्याची कला

 जीवन जगण्याची कला


 कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचे यासाठी चिंतन संतांनी केले आणि सोपे करुन सांगीतले .

प्रत्येक क्षण नूतन , त्याचा अनुभव नूतन . क्षणोक्षणी बदलणार्या भावभावनांच्या खेळात माणूस स्वतः लाच हरवून बसतो. मन दु:खी असलं की असं वाटतं हे चक्र कधी थांबेल अन् मन प्रसन्न असलं की वाटतं काळ इथेच थांबावा. 

सततचे मानसिक आंदोलन , परिस्थिती चा रेटा , त्रास नकोसा होतो. त्याचा परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे ही मन खंतावते. यावर उत्तम उपाय म्हणजे आपल्या आवडीच्या गोष्टी करत रहाणे. कधी जमतं कधी नाही . 

तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे

" मन करा रे प्रसन्न 

सर्व सुखाचे कारण " 

आयुष्यातले आनंदी क्षण वेचणे आणि चुका आपल्या असो का इतरांच्या माफ करुन वाटचाल करणे म्हणजे मनाला मुक्त करणे.

त्याचे अवीट प्रेम आणि तो कृष्ण माझा सखा आहे. हे मनांत पक्के असू द्यावे. 

कोणी मनुष्य , नातेवाईक , कोणी स्वार्थ वागविणारा आपण जवळचा मानला तरी भ्रमनिरास होऊ शकतो. पण कृष्ण मात्र प्रेमळ आणि प्रत्येकाचे विश्रांती स्थळ आहे.

ज्यांचा त्याचा कृष्ण ज्याला त्याला भेटावा आणि ओळखता यावा. 

अनिरुध्द कवीश्वर -

Monday, October 2, 2023

उदरभरण नोहे .....

 उदरभरण नोहे .....


आपल्याकडे जेवायला बसायची पण एक पध्दत आहे. ताटामधे अन्न वाढायची एक शिस्त आहे. पंगतीमधे सर्वांच्या  ताटामधे पूर्ण वाढप झाल्याशिवाय ताटातल्या अन्नाला शिवत नाहीत. संयम ठेवावा लागतो. अन्नाच्या सुगंधानी पाचनासाठी आवश्यक लाळ तयार होणे असते . ते आपसूकच साधल्या जाते.


ताट पूर्ण वाढून झाल्यावर ही सर्वांनी एकमुखाने प्रार्थना पूर्वक खालील श्लोक म्हणायची पध्दत आहे. 


" वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे।

सहज हवन होते नाम घेता फुकाचे।

जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ।।


अन्नभक्षण यज्ञकर्म आहे हे जाणून सेवन करायची रीत आहे. सद्गुरू म्हणतात त्याप्रमाणे हे शिजवलेले अन्न या स्वरुपात आपल्यापर्यंत  पोहोचवण्या साठी ज्यांचा ज्यांचा हातभार लागला त्या  सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा उद्देश आहे. 


भगवंत गीतेमधून आपल्या अस्तित्वाचे वर्णन करुन सांगताना म्हणतात


" अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः।

प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्।।१५.१४।।


प्रत्येक प्राणीमात्राच्या शरीरात मी जठराग्नी च्या स्वरुपात राहून प्राण , अपान , समान , उदान , व्यान या वायुंच्या सहाय्याने सर्व अन्नाचे पाचन करतो. 


थोडक्यात आपण जेवतो ते आपल्या देहातील ईश्वराला आहुती म्हणून अर्पण करीत असतो. तो अग्निस्वरुप आहे म्हणून ते यज्ञकर्म . 


जे अन्न आपण सेवन करु त्यापासूनच शरीर पुष्ट होते असते. यास्तव आपल्याकडे अन्न शिजवण्यापासून ग्रहण करेपर्यंत शुचिता , स्वच्छता पाळण्याची परंपरा आहे. आपण या यज्ञात जी आहुती देऊ त्याचे फळ आपल्याला मिळणार आहे याची जाणिव ठेवली पाहिजे. 


आद्य शंकराचार्यांनी रचलेल्या अन्नपूर्णा स्तोत्र आहे या यज्ञकर्माचे काय फळ मागीतले आहे पहा ...


अन्नपूर्णे सदापूर्णे शङ्करप्राणवल्लभे ।

ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वति ॥११॥


आपल्याकडे प्रत्येक कार्याला ईश्वराचे अधिष्ठान असावे अशी प्रार्थना केली गेली आहे. 


आसनमांडी घालून जेवायला बसण्यामागचा उद्देश ही आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न सेवन करु नये असाच आहे. सावकाश जेवणे म्हणजे पोटात अवकाश , थोडी जागा शिल्लक राहिल एवढंच जेवणे अपेक्षित आहे. 


अन्न धान्य पिकवणार्या शेतकर्यांविषयी, स्वयंपाक करणार्या हातांविषयी कृतज्ञता आणि आदर व्यक्त करणे सुसंस्कृतपणा चे लक्षण आहे. 


अनिरुध्द कवीश्वर -