Wednesday, May 25, 2022

निखळ मैत्री

 अंतर्मनात आपुलकी , आस्था असावी. ज्यांच्याकडे मनमोकळेपणाने रडता येईल , आपल्या साध्या गोष्टी हसण्यावारी उडवून लावल्या जाणार नाहीत , आपली दु:ख , व्यक्त केलेला मनस्ताप उघड्यावर मांडला जाणार नाही इतका विश्वास हवा . निष्कारण गैरसमज करुन घेतले जाणार नाहीत. ज्याची त्याची स्पेस दिल्या जाईल . मदत मागताना संकोच वाटणार नाही . कुठल्याही गोष्टीचा बाऊ केला जाणार नाही अशी निखळ मैत्री हवी . आनंद देता आला पाहिजे तसा तो घेता ही आला पाहिजे. 

              असे मित्र , मैत्रिणी ज्यांच्या आयुष्यात आहेत ते भाग्यवान . I am one of such person . I am lucky to have honest and broad minded friends . 

                मी त्यांच्या कडे सहज राहू शकतो , चटई वर , अंगणात , गच्चीवर कुठे ही पाय पसरुन झोपू शकतो. मैं बाहरगांव जा रहा हूॅं थोडा पैसा देकर रख असे ही सहज म्हणू शकतो. आज मी जेवायलाच येणार आहे कदाचित उशीर झाला तर थांबेन तुझ्याकडेच असं ही मोकळेपणी सांगू शकतो. किंवा मला भूक लागली आहे काहीतरी खायला दे असं मागताना मला संकोच वाटत नाही . किती ही महिन्यात , वर्षात प्रत्यक्ष भेट झाली नसली तरी मैत्रीत खंड पडत नाही.  मनाची जवळीक तशीच असते. घराजवळ , दूर अशा अंतराचा फरक मनात रहात नाही. 

              आर्थिक , सामाजिक स्थानामुळे फरक पडत नाही . भेटीची ओढ तीच असते. मित्र असो वा मैत्रिण मनात ' मैत्र ' हा एकच समत्व भाव असतो. 

           I am happy and satisfied . मैं शुक्रगुजार हूॅं उपरवाले का जिसने ऐसे दोस्तों की महफिल में मुझे जगह दी है l 🌹🌹

अनिरुद्ध कवीश्वर-

Sunday, May 15, 2022

ईशावास्यमिदं सर्वं

 ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् ।

तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम् ।।


मला तरी वाटतं हा मंत्र समष्टि मधे वावरताना मनुष्यातील परस्पर संबंधांचा  समतोल कसा राखावा याचे सूत्र सांगतो. सृष्टी निर्माण होण्यामागची कारणमीमांसा काय या प्रश्नाची उकल यातून होत नाही. उत्पत्ती नंतरचे व्यवस्थापन कशा पध्दतीनं करता येईल जेणेकरुन स्थैर्य राहील याचा विचार मांडतो. 


" तेन त्यक्तेन भुञ्जीथा " हा समाजभान आणणारा मूलमंत्र आहे असे मला वाटते.  


" त्यक्तेन भुञ्जिथा "  हे केवळ भौतिक साधनसंपत्तीच्या संदर्भात नाही तर शारिरीक सुख आणि मानसिक आकांक्षांच्या बाबतीत देखिल उपभोगाचे उचित तत्व समजाऊन सांगतो. 


पुन्हा पुन्हा पतन का ? या प्रश्नाचं उत्तर सोपं नाही. खूप आयाम आहेत. मन हे मोठं विचित्र इंद्रिय आहे. व्यक्तिला सत्य ( real ) आणि भ्रम ( virtual )  याच्या सीमारेषेवर कायम झुलवत ठेवतं. असं असून देखिल दृष्टीस पडणार्या दृष्यावरुन कोणती व्यक्ति जाणिवांच्या कोणत्या स्तरावर आहे हे कळत नाही. आपलीच परीक्षा सुरु असल्यासारखे वाटत रहाते. 


' निर्मिती ' ची योजनाच तशी असेल का ? विचारशक्तिला दमवून थकल्यावरची प्रतिक्रिया की अंती निघालेला निष्कर्ष ? वस्तू स्थिती चं यथास्थित ज्ञान होईपर्यंत केवळ अस्वस्थता !! शहाणीवाच्या चिंधड्या उडवणारी. तुम्ही मनाच्या बारिक-सारिक अवस्थांचे शब्दचित्र उभे करता. 


मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः ।

यत्क्रौंचमिथुनादेकमवधी काममोहितम् ।।


' मा निषाद ... ' सृष्टीशी एकतानता साधल्यावर आपसूक उमटलेला आक्रोश सूज्ञ व्यक्तिला अस्वस्थ करतो , अंतर्मनात करुणेची तार छेडतो . पण कार्यकारणभाव समजून घ्यायला उपनिषदातील तत्वज्ञानाची कास धरावी लागते. कालातीत सत्य वेगळ्या स्तरावर उमगते. जाणिवा तितक्या विस्तारतात अन् मन सुमन होण्याची प्रक्रिया सुरू होते. 


 " ज्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असेल , सर्व क्षमता त्यासाठी खर्च होत असेल त्यांना नीतिमान असण्याची , तात्विक चर्चा करण्याची चैन परवडत नाही. " हे अगदी वास्तवाशी जोडणारं आहे. प्रत्येक जीव जाणिवांच्या आणि समजूतींच्या वेगवेगळ्या स्तरांवर आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपापल्या समस्यांची उकल वेगवेगळ्या पद्धतींनी करावी लागते. निसर्गाची चौकट मानव निर्मित कायद्याच्या किंवा नीतिमत्तेच्या संकल्पनांनी बांधता येत नाही. निसर्गनियम स्वतंत्र , मुक्त अन् वेळी कठोर आहेत. 



तुम्ही तुमचं मुक्त चिंतन मोकळैपणानी समोर ठेवता. सागर भरला आहे , ज्याला जे हवं त्यांनी ते उचलावं. आपलं भावजीवन समृध्द करावं. 


अनिरुद्ध कवीश्वर-