Wednesday, November 29, 2023

पैल तोगे काऊ कोकताहे...

 सुप्रभात 🙏 🌹 ,


मनांत एकाचवेळी दोन विचार जागृत होतात. यालाच द्वैत म्हणत असावेत. जेव्हा मन , शरीर आणि अंतरात्मा यांचे एकाच दिशेने प्रवर्तन होते त्याला अद्वैत संबोधत असावेत. 

विश्राम बेडेकर यांच्या आत्मचरित्राचे नांवच अत्यंत समर्पक " एक झाड दोन पक्षी " असं आहे. 

ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर रित्या द्वैत-अद्वैताची गोष्टी रुपाने मांडणी करतात. खालील ओवी पहा ...

पैल तो गे काऊ कोकताहे ।

शकुन गे माये सांगताहे ॥१॥

उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ ।

पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥

दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी ।

जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥३॥

दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी ।

सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥

आंबया डहाळी फळें चुंबी रसाळीं ।

आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥

ज्ञानदेव ह्मणे जाणिजे ये खुणें ।

भेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६॥


इथे त्यांनी ही एका पक्ष्याच्या , कावळ्याच्या कोकलण्यातून शुभशकून पाहिले . 

पंढरीनाथ घरी येणार हा तो शुभशकून !! तो महाराव घरी आल्यावर त्यांच्या मीलनांत सारे सारे द्वैत संपणार आहे. 

घर म्हणजे देह आणि कावळा म्हणजे मन . त्यांचे कोकलणे म्हणजे सतत मनात चाललेला घोषा . कोणाचा ? त्या माहेरच्या पंढरीनाथाचा. 

सारी रुपके फारच मनोभावे निवडली आहेत. आपल्यासमोर ठेवताना स्वतः च्या ही मनाला साद घालत आहेत. 

केवळ अप्रतिम !! अत्यंत तरल आणि माधुर्यपूर्ण. म्हणून म्हणतात ज्ञानेश्वरी ची एक तरी ओवी अनुभवावी. 

कृष्ण , ज्ञानेश्वर महाराजांना विट्ठल रुपात भेटला. तसा ज्याचा त्याचा कृष्ण ज्याला त्याला भेटावा आणि ओळखता ही यावा. 🙏🙏🌹


अनिरुध्द कवीश्वर -

Friday, November 24, 2023

ज्याचा त्याचा कृष्ण..

 सुप्रभात 🙏,


ज्याचा त्याचा कृष्ण..


खरंच अपेक्षारहित आपुलकी , आस्था मनाला शांत करते. 

मला विट्ठल फार आवडतो. ना हात आशीर्वाद देण्यासाठी ना काही घेण्यासाठी , देणं ना घेणं फक्तं कमरेवर हात ठेऊन प्रेमानी , वात्सल्यापोटी तो आपली वाट पहात असतो. 

टाळ - मृदंगाचा सुरेल नाद त्याला प्रसन्न करतो आणि त्याची प्रसन्नता आपल्याला आनंद देते. 

सर्व त्रिविध ताप विसरायला लावतो , भुलवतो , धुंद करतो असा तो मन-मोहन आहे. स्त्री पुरुष भेदरहित सर्वांचा तो सखा आहे. 

संत जनाबाई एका अभंगात म्हणते ..

"जनी सांगे सर्व लोकां । 

न्हांऊं घाली माझा सखा ॥४॥"

हे त्याचे न्हाऊ घालणे म्हणजे भक्तिरसात भिजवून जीवाची तगमग शांत करण्यासाठी केलेला प्रेमाचा वर्षाव . धन्य ते सर्व संत ज्यांना त्यांचा सखा सापडला. 

तसा ज्याला त्याला त्याचा कृष्ण सापडावा अन् ओळखता ही यावा. 🙏🌹

जय जय रामकृष्ण हरि 

जय जय रामकृष्ण हरि 


अनिरुध्द कवीश्वर -

Wednesday, November 22, 2023

केवल आनंद ...

 अधिक सूक्ष्मात जाऊन बोलायचं झालं तर .... 


शिवसूत्र सांगतात , शिवाने  संकल्पानुसार  एकटेपणा दूर व्हावा यासाठी स्पंदशक्तिद्वारे सृष्टीची निर्मिती केली. जी काही दृष्य , अदृष्य पण अस्तित्वात असलेली त्रिगुणात्मक सृष्टी आहे ती त्या शिवसंकल्पाचा आविष्कार आहे. 

या दृष्टीनं पहाता आपले अस्तित्वच त्या शिवाच्या परमोच्च आनंदासाठी आहे. मग आपले सुख-दु:ख , त्रास असो वा निखळ आनंद, प्रेमादि नवरसात्मक भावना किंबहूना आपले जगणे अथवा आपला मृत्यु सुध्दा त्याला आनंद देण्यासाठी आहे. हे एकदा मनात रुजवलं की रस भोगून ही अलिप्तता कशी असते त्याचा अनुभव येतो. 

ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायातील ही एक ओवी - 


‘तेणे कारणे मी बोलेन। 

बोलीं अरूपाचे रूप दावीन। अतींद्रिय परि भोगवीन। 

इंद्रिया करवी।।३६।।’


नेति नेति असे म्हणून त्या परब्रह्माचे वर्णन करण्यास असमर्थता वेद दर्शवतात . रुप नसलेल्या त्या अरुपाचे रुपसुध्दा मी वाणीद्वारे दाखवीन एवढंच नव्हे तर अतिंद्रीय मी इंद्रियांच्या द्वारे भोगवीन इतकं समर्पक आणि आत्मविश्वासाने ज्ञानेश्वरच सांगू जाणे. 

केवळ अलौकिक हृदयाला भिडणारी , रसपूर्ण अशी त्यांची एक तरी ओवी अनुभवावी 🙏🌹


अनिरुध्द कवीश्वर -

Friday, November 10, 2023

राहिले ओठआतल्या...

 सुप्रभात,


कधी कधी शब्द ओठातून बाहेर यायला नाराज असतात , कधी परिपूर्णतेला शब्दांची गरज भासत नाही , कधी भावनावेग अति तीव्र होतात अन् वाणी मूक होते . 


कधी वा रा कांत यांचे एक गीत आठवते ...

राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे 

राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे

भेट होती आपुली का ती खरी, कि स्वप्न माझे ?


कापले ते हात हाती बावरे डोळ्यात आसू

आग पाण्यातून पेटे जाळणारे गोड हासू

दोन थेंबांच्या क्षणांचे प्रीतीचे तकदीर माझे


गर्द हिर्वे पाचपाणी रक्तकमले कुंकुमाची

खेळताना बिंबलेली शुभ्र जोडीसार सांची

आठवे ? म्हटलेस ना तू ? हे हवेसे विश्व माझे


मी म्हणू कैसे, फुला रे, आज तू नाहीस येथे

वेळ दारी सावलीची रोज असुनी बार देते

लाख पुष्पे तोडिल्याविण ये भरोन पात्र माझे


मनाचा मनाशी होत असलेला संवाद उच्चारण्याची पात्रता वैखरीमधे असतेच असं नाही. पण कवींची प्रज्ञा तरल असते. त्यांच्या शब्दांमधे मनांत उमटलेले भाव प्रकट करण्याचे सामर्थ्य असते.

ज्याला डोळ्यांतले भाव वाचता येतात त्याला शब्दांची ही अडचण होते . हृदयाची स्पंदने अन् जाणिवांचे स्फुरण स्वयंपूर्ण असते. 

मन सदैव प्रेम आणि वात्सल्याच्या भावनांनी ओथंबलेले राहो. 

अनिरुद्ध कवीश्वर -

Thursday, November 9, 2023

संवाद

 सुप्रभात 🙏

दोन व्यक्ती जेव्हा संवाद साधतात तेव्हा अप्रत्यक्षरित्या आत्मिक तरंगांशी संलग्न होण्याचा प्रयत्न करतात. चार वाणी वैखरी , मध्यमा , पश्यंती आणि परा . 

यापैकी वैखरी वाणी तील ध्वनिकंपनांशी आपण परिचित आहोत. अक्षरं आणि शब्दांच्या उच्चारातून वैखरी वाणी प्रत्यक्ष रित्या आपण ऐकतो. 

मध्यमा वाणी म्हणजे अक्षरं आणि शब्द केवळ दृष्य स्वरुपात आपल्यासमोर आले तरी विचार प्रवर्तन होते. याचा ही  आपल्याला पुस्तकांच्या माध्यमातून परिचय असतो. 

पश्यंती वाणी मधून स्वतः चे स्वतः शी वैचारिक मंथन कायम सुरु असते . त्यातून देखिल विद्युत-चुंबकीय तरंग प्रसारित होत असतात. 

परावाणी ही विश्वचैतन्यात स्फुरणार्या  तरंग आणि तदानुषांगिक कंपनांशी चित्त जोडून घेते . 

विश्वचैतन्याची व्याप्ती अपरिमित आहे. त्यामुळे दोन व्यक्ती ज्यांचे विचारतरंग जुळतात त्या शारिरीक दृष्ट्या  एकमेकांपासून 

कितीही दूर असल्या तरी वास्तविक पहाता अगदी ह्रदयाला स्पर्श करीत असतात. 

आपले खरे आप्त तेच असतात हो की नाही?

अनिरुध्द कवीश्वर -

Saturday, November 4, 2023

ज्ञानेश्वरी मधील विज्ञान

 ज्ञानेश्वरी मधील विज्ञान...

आम्ही  आधी आमचे ग्रंथ अभ्यासले पाहिजेत . त्यावेळची शब्दावली ( Terminology  )वेगळी असली तरी आधुनिक वैज्ञानिक संकल्पनांशी नाते जोडणारी आहे. 

ज्ञानेश्वरी मधे अध्यात्म आणि वाड्:मय सौंदर्या बरोबर विज्ञान ही प्रतिपादिले आहे. 

अथवा नावें हन जो रिगे । 

तो थडियेचें रुख जातां देखे वेगें ।

तेचि साचोकारें जों पाहों लागे । तंव रुख म्हणे अचळ ॥९७॥

अथवा जो नावेत बसून जातो त्याला किनार्‍यावरची झाडे भरभर चालली आहेत असे दिसते. पण वस्तुस्थिती जेव्हा तो पाहू लागतो तेव्हा ती झाडे स्थिर आहेत असे तो म्हणतो. ॥९७॥

थिअरी ऑफ रिलेटीव्हिटी - आईन्स्टाईन

आणि उदोअस्तुचेनि प्रमाणें । 

जैसें न चालतां सूर्याचें चालणें ।

तैसें नैष्कर्म्यत्व जाणें । 

कर्मींचि असतां ॥९९॥

आणि सूर्य उदय व अस्त पावतो, या एका प्रमाणावरून तो चाललेला भासतो, पण वास्तविक तो चालत नाही, त्याप्रमाणे तो कर्माचरण करीत असताही आपले नैष्कर्म्य जाणतो. ॥९९॥

गॅलेलियो, कोपर्निकस यांच्या काही शतके अगोदर ज्ञानदेवांनी प्रतिपादिले आहे.

परी महाभूतें पोटीं वाहे । 

तेवींचि परमाणूमाजीं सामाये ।

या विश्वानुसार होये । 

गगन जैसें ॥ १६-१७३ ॥

जसे आकाश आपल्या पोटात (वायू वगैरे) महाभूतांस धारण करते परंतु त्याचप्रमाणे ते (आकाश) परमाणूमध्ये मावले जाते आणि जसे हे विश्व आहे तसे ते होते. ॥१६-१७३॥

क्वांटम् फिजीसिस्ट ( पूॅंज सिध्दांती ) यांच्या ही आधी ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले आहे. 

डॉ काप्रा म्हणतो , " In eastern Mysticism, Universal inter-woveness includes the observed and observer's consciousness; that is also the experience of atomic science. The Mystics and the scientist often arrive at similar conclusion, one from within and the other from outside ... " 

ज्ञानेश्वर महाराज यासंदर्भात त्यापुढे जाऊन सांगतात ब्रह्माच्या उपासनेत त्रिपुटीच्या संकल्पनेचा त्याग करावा लागतो. 

लक्ष लावुनि त्रिपुटी ठाण त्रिभंगी चोखडें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

निर्गुण ब्रह्माच्या उपासनेत ध्यान, ध्याता, व ध्येय या त्रिपुटीचा त्याग करावा लागतो. 

अनिरुध्द कवीश्वर-

संदर्भ: श्री ज्ञानेश्वरी-विज्ञान दर्शन

लेखक मुकुंद सदाशिव गोखले