Saturday, May 18, 2024

नागालँड

 *नागालँड एक समृध्द निसर्गाचा  आणि अतिथ्यशीलतेचा परिचय देणारा प्रदेश....*

आम्ही नागालँड मधे गेलो होतो तेव्हा प्रत्यक्ष नागा लोकांच्या घरात दिवसभर राहून त्यांची कम्युनिटी आणि दिनचर्या पाहिली होती. 

भौगोलिक स्थिती आणि रीतीभाती अशी काही वैशिष्ट्ये सोडली तर मानवी स्वभाव सर्व ठिकाणी सारखाच असतो. या नागा लोकांमधे ज्यांच्याविषयी आस्था असते , आदरभाव दाखवायचा असतो त्यांना ते थेट स्वयंपाकघरात नेतात. 

आपुलकी दर्शवण्यासाठी ते सफरचंदासारख्या एका फळांची मंदिरा छोट्या पेल्यात स्वतः च्याच हातांनी ऑफर करतात. त्यांनी दिलेला तो मान म्हणून प्रत्येकांनी पहिला पेग घ्यावा असा संकेत आहे. त्यानंतर तुम्ही घ्या किंवा नका घेऊ पण पहिला त्यांनी दिलेला स्वीकारावा लागतो. आम्ही सर्वांनी त्यांचा मान राखला. चव अत्यंत सुंदर होती. पारंपारिक पध्दतीनी बनवतात. 

आम्ही सर्व निरामिष जेवणारे म्हणून यजमान स्त्री ने डाळ , भात , बटाट्याची भाजी आणि कांदा , मुळा असे सॅलड केले होते. यजमान स्वतः मात्र जेवून कामावर निघून गेले होते. तिथे अशी पध्दत आहे की पहिले अन्न ते वाढतात अन् नंतर सर्व शिजवलेलं अन्न एका ठिकाणी आणून ते स्वयंपाक घराबाहेर जातात. पुढे सर्व तुम्ही तुमच्या हातांनी परसून घ्यायचे. ते तुम्ही जेवत असताना तिथे थांबत नाहीत. कारणं काही असोत. पण त्यामुळे अतिथी धर्माला झळ पोहोचत नाही. तिथली परंपरा जपण्याचा तो एक मार्ग आहे. 

स्वयंपाक घरात कपडे लटकवतात तशा भरीव बांबूवर मांस वाळत ठेवलेले होते . पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या सुकलेल्या मांसाचा अजिबात दुर्गंध नव्हता. काय कारण असेल माहित नाही . घर साधेच मातीचे लिंपण केलेले पण स्वच्छ होते. तीन खोल्यांचे घर होते. या घरात सात जणांचे कुटुंब रहात होते. नवरा-बायको , दोन मुलं तीन मुली . मोठी मुलगी आईला मुलं सांभाळण्यात मदत करत होती. 

टेकाडावर सर्व वस्ती होती. मधल्या भागात शासकीय मदतीनी सभा घेण्यासाठी गोलाकार पण उघडी  जागा बांधून घेतली होती. 

डोंगर उतारावर एका बाजूला पहाडातून येणारे पाणी साठवणुकीसाठी तिथलेच दगड कोरुन टाक्या बनवल्या होत्या. सततच्या धारेमुळे ओसांडून वाहणार्या पाण्याची अशी रचना केली होती की त्याखाली सचैल स्नान करता येईल. स्त्रिया आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या वेळा नेमून दिलेल्या होत्या . कपडे धुण्यासाठी पण तीच व्यवस्था अंमलात आणली होती. 

बहूतेक सर्व पुरुष पहाटे सहा ते संध्याकाळी तीन चार वाजेपर्यंत शेतात काम करतात . अथवा अन्य घरातील लागणार्या वस्तू आणण्याचे काम करतात. स्त्रिया दिवसभर मुलांना सांभाळणे , स्वैपाक करणे आणि विशिष्ट प्रकारच्या काळ्या आणि लाल रंगांचे धागे वापरुन घरच्या हातमागावर विविध वस्तू जसे मफलर , झोळ्या ,  कानटोप्या , शाल वगैरे विणण्याचे काम करतात. आपण अवश्य तिथे खरेदी करुन त्यांच्या स्वावलंबित्वाच्या प्रयत्नांना हातभार लावावा. 

डोंगर माथ्यावर एक पुराणा दगड-मातीनी बांधलेला किल्ला होता. आज त्यांची बरीच पडझड झाली आहे. आम्ही तो पहाण्यासाठी वर चढून गेलो. तिथे फोटोसेशन केले. वरुन सभोवतालचा सारा परिसर फार सुंदर दिसतो. 

डोंगराच्या पायथ्याशी दोन बहिणींनी चालवलेले एक रेस्टॉरंट ही होते. अंतर्गत रचना निसर्गाशी जुळवून घेणारी , रंगीत तसंच आधुनिकतेचा स्पर्श असणारी होती. कमालीची स्वच्छता आणि टापटीप होती. बहूधा बरेच टूरिस्ट इथे येत असावेत.आम्ही इथे चहा घेतला. सफरचंदसदृष फळांच्या फोडी वाळवून त्या जेवणा नंतर खाण्याची इथे पध्दत आहे. आम्ही ते आमच्यासाठी विकत घेतलं. स्वादिष्ट चव होती. 

एक वेगळाच व्यवसाय एका घर-दुकान चालणार्या स्त्री ने सुरु केला होता. बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांसाठी तिने दुकानाशेजारी एक आधुनिक पध्दतीचे टॉयलेट कम बाथरुम बांधून घेतले होते. कमालीचे स्वच्छ राखले होते. डोंगर चढून किल्ला पाहून येणार्या प्रवाश्यांची चांगली सोय केली होती. दहा रुपये चार्ज घेत होती. पण अत्यंत गरजेची वास्तू बांधल्या मुळे प्रवासी स्वच्छता पाहून आश्चर्यचकीत होऊन पैसे देत. 

कधीकाळी नागालँड मधे मॅन इटर्स होते. आज ती जमात त्यातून बाहेर आली आहे. एकंदरीतच निसर्गाशी जुळवून घेत स्वास्थ्य पूर्ण जीवन जगण्याची त्याचबरोबर आधुनिकतेशी नाळ जोडून घेण्याची त्यांची मानसिक लवचिकता पाहून  मनुष्याच्या उत्तरोत्तर प्रगतीशील होण्याच्या सहज वृत्तीचा परिचय देत  होती. 

जरुर पहावा , जाणून घ्यावा असा प्रदेश . 

अनिरुध्द कवीश्वर -