अधिक सूक्ष्मात जाऊन बोलायचं झालं तर ....
शिवसूत्र सांगतात , शिवाने संकल्पानुसार एकटेपणा दूर व्हावा यासाठी स्पंदशक्तिद्वारे सृष्टीची निर्मिती केली. जी काही दृष्य , अदृष्य पण अस्तित्वात असलेली त्रिगुणात्मक सृष्टी आहे ती त्या शिवसंकल्पाचा आविष्कार आहे.
या दृष्टीनं पहाता आपले अस्तित्वच त्या शिवाच्या परमोच्च आनंदासाठी आहे. मग आपले सुख-दु:ख , त्रास असो वा निखळ आनंद, प्रेमादि नवरसात्मक भावना किंबहूना आपले जगणे अथवा आपला मृत्यु सुध्दा त्याला आनंद देण्यासाठी आहे. हे एकदा मनात रुजवलं की रस भोगून ही अलिप्तता कशी असते त्याचा अनुभव येतो.
ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायातील ही एक ओवी -
‘तेणे कारणे मी बोलेन।
बोलीं अरूपाचे रूप दावीन। अतींद्रिय परि भोगवीन।
इंद्रिया करवी।।३६।।’
नेति नेति असे म्हणून त्या परब्रह्माचे वर्णन करण्यास असमर्थता वेद दर्शवतात . रुप नसलेल्या त्या अरुपाचे रुपसुध्दा मी वाणीद्वारे दाखवीन एवढंच नव्हे तर अतिंद्रीय मी इंद्रियांच्या द्वारे भोगवीन इतकं समर्पक आणि आत्मविश्वासाने ज्ञानेश्वरच सांगू जाणे.
केवळ अलौकिक हृदयाला भिडणारी , रसपूर्ण अशी त्यांची एक तरी ओवी अनुभवावी 🙏🌹
अनिरुध्द कवीश्वर -
No comments:
Post a Comment