Friday, April 15, 2022

तडित तडाडे

 आपल्याकडे काही ग्रंथकार बुध्दी म्हणजे मनाचाच विस्तार मानतात. मन हे एक विलक्षण रसायन आहे. शरीराचा ताबा घेऊन कोणत्या क्षणी ते कोणाला काय करायला भाग पाडेल याबद्दल काहीच ठोकताळे बांधता येत नाहीत.

आपल्याकडे एक मार्मिक म्हण आहे " वड्याचं तेल वांग्यावर काढणे " तात्कालिक कारणाने मनांत साचत गेलेल्या असंतोषाचा मानसिक संतूलनावर परिणाम घडत असतो. 

आत्यंतिक क्रोधाच्या क्षणी मनुष्य एक तर दुसर्याच्या जीवावर उठतो किंवा स्वतः च्याच जीवावर उठतो. भगवान कृष्ण गीतेमध्ये ही अवस्था समजाऊन सांगताना म्हणतात " क्रोधात भवती संमोह , संमोहात बुध्दीनाश: "

त्याचवेळी पश्चात बुद्धी कार्यरत होते. मनुष्य अंतर्मुख होऊन विचार करु लागतो. भानावर येतो . इथे परिवर्तन सुरु होते. अत्यंत तीव्र भावनात्मक परिस्थितीतून बाहेर येण्याच्या वेळेस त्यांच्यासमोर ज्या गोष्टी येतात त्यांचा साधक बाधक विचार करण्याची बुध्दी त्याच्यातली ऊर्जा, अक्षम्य कृत्याच्या परिमार्जनार्थ कार्य करु इच्छिते. त्यातून काही उच्च दर्जाचे कार्य , साहित्य जन्माला येते. आपल्याकडे वाल्या कोळ्याचे वाल्मिकी ऋषि मधे परिवर्तन झाल्याचे उदाहरण आहेच. 


एका कवितेच्या काही ओळींची आज आठवण झाली. 


"तडित तडाडे उपजे काया

काळ्या कभिन्न मेघोदरी 

तरी का वीज नसे का साजरी "


अनिरुद्ध कवीश्वर-

Tuesday, April 12, 2022

स्पंदशास्त्र

 काश्मीर फाईल्सच्या निमित्ताने ...


शिवसूत्रांचा मागोवा 


आठव्या शतकातील एक विद्वान आणि शिवोपासक ' वसुगुप्त ' याला स्वप्नांत दृष्टांत झाला. पहाटे तो स्वप्नांच्या अनुषंगाने शोधार्थ निघाला तेव्हा एका खडकावर कोरलेली शिवसूत्रे त्यास पहावयास मिळाली. त्यांनी स्पर्श करताच खडक उलटा झाला. जणू त्यांनी ती वाचून आत्मसात करावीत एवढंच प्रयोजन होतं.


काश्मीर मधील महादेव पर्वत हे ते ठिकाण अन् आज ही तो खडक 'शंकरपाल' म्हणून ओळखला जातो. दल लेक पासून हा प्रदेश जवळ असल्याचे समजते.


वसुगुप्तानी आपला शिष्य भट्टकलटाला ही शिवसूत्रे उलगडून सांगीतली. भट्टकलटाने ती सूत्रबध्द करुन ' स्पंदकारिका ' या ग्रंथामध्ये लिखित स्वरूपात आणली. देवनागरी लिपी मधील स्वर - व्यंजनांची उत्पत्ती तसेच त्यांच्या अधिष्ठात्री देवता आणि शक्ति यांचे वर्णन त्यात आढळते. सृष्टीच्या निर्मितीचे गूढ यात सांगीतले आहे. ग्रंथ मुळातूनच वाचायला हवा. हा अक्षरविज्ञान त्याचबरोबर व्यवस्थापनाची मूळ सूत्रे यांचा अलौकिक ठेवा आहे. 


भट्टकलटानंतर ही  परंपरा मुकुल भट्ट , भट्टेन्दुराज, क्षेमराज , योगराज , स्वामी मंकक (१८६०) , स्वामी राम (१८५२-१९१४) , स्वामी लक्ष्मण जू (१९०७-१९९१) पुढे नेली. 

स्वामी लक्ष्मण जू यांनी जम्मू-काश्मीरमधे ईश्वर आश्रम स्थापन केला आहे. बरेच विदेशी अभ्यासक इथे येत असतात.  


अशी ही ज्ञानोपासकांची , साधकांची  परंपरा अव्याहतपणे सुरुच आहे. अगदी आत्ताचे उदाहरण घ्यायचे झाले तर चित्रा व उमेश नगरकट्टे या उच्चविद्याविभूषित दांपत्यानी ( both Ph.d in mathematics )  स्पंदकारिका या शिवसूत्रांवर आधारीत ग्रंथाचा अभ्यासपूर्ण इंग्रजी अनुवाद २०१६ मधे प्रसिद्ध केला आहे. स्वामी मुक्तानंदांचा त्यांना आशीर्वाद होता.


ज्ञानेश्वर माऊलींच्या अमृतानुभव या ग्रंथामध्ये तिसऱ्या अध्यायात सोळाव्या ओवीमधे स्पष्टपणे शिवसूत्रांचा उल्लेख आहे. आठव्या शतकातील वसुगुप्त आणि बाराव्या शतकातील ज्ञानेश्वर माऊली यात सुमारे चारशे वर्षांचे अंतर आहे. 

आजच्या काळातील संदेशवहनाचे, दळणवळणाचे कोणते साधन नसताना ज्ञानाची ही परंपरा कशी अखंडीत राहिली असेल ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नाथपंथीयांद्वारा गुरु-शिष्य परंपरेतून गुह्यरित्या पिढी दर पिढी पोहोचलं गेलं असावं. 

आज पुस्तक रुपाने अनेक विद्वानांनी मूळ संस्कृत भाषेतील स्पंदशास्त्राची संहिता विविध भाषांमध्ये अनुवादित केली आहे. 


यवतमाळचे डॉ. अविनाश जोशी यांनी स्पंदकारिका या ग्रंथातील अक्षरविज्ञानावर तीस वर्षे संशोधन करुन त्यावर आधारित थेरपी सुरू केली आहे. त्यांचा मुलगा स्वप्निल ही आयुर्वेदिक वैद्य असून त्याने ही थेरपी नागपूर येथे पुढे सुरु ठेवली आहे. प्रत्येक अक्षरांच्या वैशिष्ट्यपूर्ण उच्चारणाचा शरीराच्या कोणकोणत्या भागावर कसा परिणाम साधल्या जातो याचं वर्णन करणारा ' आयुर्वेदीय अमृतानुभव ' हा ग्रंथ लिहिला आहे. 


काश्मीर हा केवळ एक भूभाग नाही तर सांस्कृतिक आणि ज्ञानमार्गावरील साधकांनी निर्माण केलेल्या परंपरांचा अमूल्य ठेवा आहे. संपूर्ण भारतभर अनेक प्रांतातील वेगवेगळ्या भाषिक विद्वानांनी त्याचा लाभ घेतला आहे.

वरील माहिती ही प्रचंड सागरातील एका थेंबाएवढीच आहे हे समजलं तरी त्याचं महत्व लक्षात येईल. 


अनिरुद्ध कवीश्वर- 

Friday, April 8, 2022

अमृतानुभव ऐक्य विचार

 अमृतानुभव - ऐक्य विचार


मी 'स्व' 'स्थ' होत असताना ऊर्जेच्या तरंगांशी एकरुप होतो अन् त्याच्या आनंदलहरीं वर झुलत असता माझं स्वतंत्र अस्तित्व रहात नाही . माझ्यातला मी स्वान्त सुखाच्या अधीन स्वतःला झोकून देतो. सौंदर्याचा आस्वाद घेत घेत स्वतः च सौंदर्यलहरी होणं ही अनुभूती वर्णनापलिकडे आहे. 

ज्ञानेश्वर महाराज आपल्याला अत्यंत समर्पक उदाहरणांद्वारे तो अमृतानुभव समजाऊन देतात. 

अहो ऐक्याचे मुद्दल न ढळे l

आणि साजिरे पणाचा लाभु मिळे l

तरी स्वतरंगांची मुकुळे l

तुरंबु का पाणी ll ५९ ll अमृतानुभव

पाण्यावर तरंग उठत असतात. स्वतः भोवती रिंगण घालतात . ते थुई थुई नाचत , गिरकी घेत असताना पाहाणं एक सुंदर अनुभव असतो. 

तरंग संपले की दृष्य नाहिसे होऊन तरंग पाण्यात सामावून जातात.  मूळ पाणी जसेच्या तसेच रहाते.   

दृष्यमान जरी भिन्न भासले तरी मूळ एकच असल्याची सौंदर्यजाणीव होत असता मुद्दलाला धक्का न लागता सहज आस्वाद घ्यायला काय हरकत आहे.  मुळास हानी न पोहोचवता सौंदर्याकडे पहाण्याची अशी नजर खरे ऐक्य साधते. 

सौंदर्य कुठे आणि कशाप्रकारे प्रकट होऊ शकते अन् त्याचा अनुभव कसा घ्यावा याची उत्तम शिकवण माऊली सोप्या सोप्या उदाहरणातून स्पष्ट करते. 

हे कैवल्याचे चांदणे अविरतपणे माऊलीच्या शब्दा शब्दांतून झिरपत असते. 


अनिरुद्ध कवीश्वर-


इक ॐकार सत् नाम वाहे गुरु "

 " इक ॐकार सत् नाम वाहे गुरु ..."


साधक असो वा नसो शंका , चिकित्सा , संशय , तर्क , बुध्दीगम्य वैचारिक वादळं , अविश्वास , भ्रम ,  मानसिक उद्विग्नता प्रत्येक आत्ममग्न या अवस्थेतून कालक्रमणा करत असतो. प्रत्येक गोष्ट पारखून स्वीकारायची त्याचे हे स्वाभाविक परिणाम आहेत. गैर काहीच नाही. इथे घाईघाईत कोणतीच गोष्ट होत नाही .


चिकित्सा करुन करुन मन थकते , श्रान्त क्लान्त होते अन् वक्षस्थळी लवंडते तेव्हा हृदयस्थ कोमल होतो. त्याच्या हळुवार , प्रेमळ स्पर्शानी मनाच्या तारा झंकारु लागतात ... तो क्षण , तोच क्षण डोळ्यातून झरणार्या अश्रुधारा अंतस्थाला शुद्ध करत अव्याहत वाहू लागतात . 


ज्ञान संशयनिवृत्त होऊन भक्तिच्या वाटेवर अग्रेसर होऊ लागते. मन सर्व अपेक्षा सांडून केवळ अनामिक आनंदाने भरुन रहाते. 


" इक ॐकार सत् नाम वाहे गुरु ..."


मन जुळवून घ्यायची आवश्यकता नसते ,  ते फक्त विस्मृतीमुळे भिन्न असल्याचे भासते. 🙏🙏


अनिरुद्ध कवीश्वर-