Saturday, July 30, 2022

शोध अंतर्मनाचा...

 

शोध अंतर्मनाचा ...

आपण जितकं बोलून किंवा लिहून शब्दांतून व्यक्त होतो त्यापेक्षा कैक पटीनी मोठ्या मौनात , शांतीमधे त्याचं अस्तित्व अवस्थित असतं. अनंत झगमगणार्या प्रकाशमय दूधगंगांना ही सामावून घेणारी तथाकथित पोकळी अंधारीच असते.

काळोखाला ही वाणी असते का ? की केवळ हुंकार "तथास्तू" म्हणणारा ? कालातीत , सदैव वर्तमानात , संवादी ? कुठल्याही माध्यमांची गरज नसलेला , स्वयंभू?

निव्वळ स्पंदन , प्रसारीत होत जाणारी एक अविरत  उर्जा , अनादि-अनंत , शिव संकल्प ...

घटना म्हणजे स्पंदनांचा दृष्य परिणाम !! कुठलीही उपाधि नसलेला . वेध शाश्वताचा , सातत्याचा , सत्याचा की स्वयंस्फूर्तीने दूर होणार्या पटलांचा ? आजचे सार्वकालिक  ज्ञानोपरांत तात्कालिक या वर्तुळाकार मार्गाचा ?

मागोवा माझाच , मीच घेतलेला, की शोध अज्ञाताचा ? अनुत्तरीत मालिका अवरुद्ध करणारी की मुक्तीचे दरवाजे किलकिले करणारी एक यक्षप्रश्न !!

मानस एकच , चित्त एकच फक्त वृत्तीची आवर्तने वेगवेगळी .  " जगन्मिथ्या " , " एकोहं ",  " तत्वमसि " "अहं ब्रह्मास्मि " ज्ञानेश्वर माऊली च्या भाषेत "आत्मरुपा"

मौनाची भाषा अनुभव समृध्द करणारी 🙏🙏

अनिरुद्ध कवीश्वर-

Tuesday, July 26, 2022

ज्याचा त्याचा कृष्ण ...

 जन्म आणि मृत्यू ही फक्त स्थित्यंतरे आहेत. प्रत्येक क्षणाक्षणाला शारीरिक तसेच मानसिक स्थितीमध्ये ही बदल होत असतात. जीव सतत दु:खात किंवा सतत सुखात ही राहू शकत नाही.


मन जिथे जिथे म्हणून संलग्न होतं तिथे तिथे सर्व भावभावना रुजतात. सुख दु:ख या मनाच्या संकल्पना आहेत.  मनाविरुद्ध अथवा न रुचणार्या गोष्टींमुळे दु:ख वाटते. मनासारखं झालं म्हणजे सुखावह क्षण छान वाटतात. 


माझ्याच वाट्याला का यावे दु:ख हा प्रश्न फार त्रास देतो. 


बुध्दिवंतांसाठी आपल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजेत , संदेह मिटला पाहिजे , बरोबर असो की चूक सर्व गोष्टी मला कळायलाच हव्यात हा अट्टाहास मनुष्याला सतत अस्वस्थ करतो. साहजिकच त्याचे मनस्वास्थ्य बिघडते. 


नामस्मरणाने तर कोणाला गायनानी , वादनाने , कोणाला नृत्यानी , वाचनानी कधी कोणाला भटकंती केल्यानी , कोणाला समुद्राकाठी - नदीकाठी शांत बसल्यानी  चित्त हळूहळू मनाला दिशा देते. आपापल्या कृष्णाच्या रुपाशी मन जडले की इतर व्यवधानं सावकाश का होईना कमी होत जातात अन् त्या अनुषंगाने वैचारिक गोंधळ कमी होतो. 


विचारांमध्ये सुस्पष्टता आली की कार्य करण्यात शिस्त येते. संतोषानी मनाची चलबिचल कमी होते. 


जीवाचा विसावा त्याला माहित असतो. ज्याच्या त्याच्या कृष्णाची स्पंदने कुठे , कशी जाणवतील हे तो कृष्णच ठरवतो.


अनिरुद्ध कवीश्वर -

Sunday, July 24, 2022

ताटीचे अभंग - मुक्ताबाई

 

ताटीचे अभंग १ ते १२


संत जेणें व्हावें । जग बोलणे साहावें ॥१॥
तरीच अंगी थोरपण। जया नाही अभिमान ॥२॥
थोरपण जेथे वसें । तेथे भूतदया असें ॥३॥
रागें भरावे कवणाशी। आपण ब्रम्ह सर्वेदेशी ॥४॥
ऐशी समदृष्टी करा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥५॥


योगी पावन मनाचा।साही अपराध जनाचा ॥१॥
विश्व रागें झाले वन्ही। संती सुखें व्हावें पाणी ॥२॥
शब्द शस्त्रं झालें क्लेश । संती मानावा उपदेश ॥३॥
विश्व पट ब्रह्म दोरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥


सुखसागरी वास झाला।उंच नीच काय त्याला॥१॥
अहो आपण जैसे व्हावें। देवें तैसेंचि करावें ॥२॥
ऐसा नटनाटय खेळ। स्थिर नाही एकवेळ ॥३॥
एकापासुनी अनेक झाले। त्यासी पाहिजे सांभाळिले ॥४॥
शून्य साक्षित्वें समजावें । वेद ओंकाराच्या नावें ॥५॥
एकें उंचपण केले। एक अभिमानें गेलें ॥६॥
इतकें टाकुनी शांती धरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥७॥


वरी भगवा झाला नामे। अंतरीं वश्य केला कामें ॥१॥
त्याला म्हणूं नये साधू। जगी विटंबना बाधू॥२॥
आपआपणा शोधून घ्यावें। विवेक नांदे त्याच्या सर्वे ॥३॥
आशा दंभ अवघे आवरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥


संत तेचि जाणा जगीं। दया क्षमा ज्यांचे अंगी ॥१॥
लोभ अहंता न ये मना। जगी विरक्त तोची जाणा ॥२॥
इह परलोकीं सुखी। शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखीं ॥३॥
मिथ्या कल्पना मागें सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥


एक आपण साधू झाले। येर कोण वाया गेले ? ॥१॥
उठे विकार ब्रह्मी मूळ। अवघे मायेचें गबाळ ॥२॥
माय समूळ नुरे जेव्हां। विश्व ब्रह्म होइल तेव्हां ॥३॥
ऐसा उमज आदिअंतीं। मग सुखी व्हावे संती ॥४॥
चिंता क्रोध मागे सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥५॥

ब्रह्म जैसें तैशा परी।आम्हा वडील भूतें सारी ॥१॥

अहो क्रोधे यावें कोठे । अवघे आपण निघोटे ॥२॥

जीभ दातांनी चाविली। कोणें बत्तीशी तोडीली? ॥३॥

मन मारुनी उन्मन करा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥


सुखसागर आपण व्हावें । जग बोधें निववावें ॥१॥

बोधा करुं नये अंतर । साधू नाहिं आपपर ॥२॥

जीव जीवासी पैं दयावा । मग करूं नये हेवा ॥३॥

तरणोपाय चित्तीं धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥


सांडी कल्पना उपाधी। तीच साधूला समाधी॥१॥

वाद घालावा कवणाला। अवघा द्वैताचा हो घाला॥२॥

पुढे उमजेना काय । उडत्याचे खाली पाय ॥३॥

एक मन चेष्टा करी। भूतें बापुंडी शेजारी ॥४॥

अवघी ईश्वराची करणी। काय तेथें केलें कोणीं ॥५॥

पुन्हा शुद्ध मार्ग धरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥६॥


१०

गिरीगव्हारे कशासाठीं। रागें पुरवीली पाठी ॥२॥

ऐसा नसावा संन्यासी। परमार्थाचा जो कां द्वेषी ॥३॥

घर बांधिले डोंगरी। विषया हिंडे दारोदारीं ॥४॥

काय केला योगधर्म। नाही अंतरी निष्काम ॥५॥

गंगाजळ हृदय करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥६॥


११

अहो क्रोधे यावें कोठे । अवघे आपण निघोटे ॥१॥

ऐसे कळलें उत्तम । जन तेची जनार्दन ॥२॥

ब्रीद बांधिलें चरणीं । नये दावितां करणीं ॥३॥

वेळे क्रोधाचा उगवला। अवघा योग फोल झाला॥४॥

ऐशी थोर दृष्टी धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥५॥


१२

अवघी साधन हातवटी। मोलें मिळत नाही हाटीं ॥१॥

शुद्ध ज्याचा भाव झाला। दूरी नाही देव त्याला॥२॥

कोणी कोणास शिकवावें । सार साधुनिया घ्यावें ॥३॥

लडिवाळ मुक्ताबाई। जीव मुदल ठायीचे ठायीं ॥४॥

तुम्ही तरुनी विश्व तारा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥५॥


सारा खेळ माझाच हा 

मीच मांडिला मोडिला

अवघे अस्तित्व माझेच

मीच राखिले अन् विरवीले 


स्वानंदे रचिली कहाणी

नसे इथे दूजा कोणी

आपुलेच शब्द अन् गाणी

आळविणे सूर निजकंठी 


विस्तार माझ्या कल्पनेचा

माझ्या हाती न राहिला

पुढे सरता वाढता जाई

आकळिले तरी वळत नाही 


" मन मारुनी उन्मनी करावे " 

असे जेव्हा मुक्ताबाई माऊलीला समजावून सांगते तेव्हा अपेक्षाभंगातून निर्माण झालेल्या क्रोध आणि उद्वेगातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवते. संतांची शब्दयोजना ( टर्मिनालॉजी ) वेगळी असेल पण आधुनिक मानसशास्त्राच्या सीमा त्यांनी ओलांडून निखळ सत्याचा मार्ग स्वतः च्या जीवनदर्शनातून मांडला आहे. 

अनिरुद्ध कवीश्वर-




Friday, July 8, 2022

परतवारी...

 परतवारी...


 पुढे चालणे म्हणजे मागे परतणे ...


ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम्। ...

भगवत् गीता अध्याय १५ श्लोक क्रमांक 


वरवर पहाता विक्षिप्त वाटणार्या संकल्पना सूज्ञ मनाला अध्यात्मिक विषयाबाबत कौतुहल निर्माण करणार्या आहेत. 

अध्यात्मयोगामधे अनुप्रसव आणि प्रतिप्रसव अशा संकल्पना आहेत. अनुप्रसव म्हणजे सूक्ष्मातून स्थूलात येणे आणि प्रतिप्रसव म्हणजे स्थूलातून सूक्ष्माकडे परतणे. एकप्रकारे मनाशी मनाद्वारे घडवून आणलेली परतवारी. 

उर्ध्वगति अन् अध: गति अशा दोन गति आहेत. या फक्त दिशा दर्शवणार्या आहेत. उर्ध्वगति ही सृष्टीच्या मूल कारणा कडे नेणारी समजल्या गेली आहे . अध: गति ही त्यांच्या विपरीत म्हणजे मूल उर्जेतून प्रसरण पावत असलेल्या स्थूल प्रकृतिस संबोधित करते. 

अध्यात्मातील प्रगति ही मोक्षप्राप्ती साठी उगमाकडे , मूलाकडे नेणारी असते. यासाठी योजिलेला शब्द म्हणजे प्रतिप्रसव प्रक्रिया. हा असा गूढार्थ , पुढे चालणे म्हणजे मागे परतणे यात अभिप्रेत आहे. तोच उर्ध्वमूलं मधे ही आहे. 

शैव मतानुसार मूळ उर्जेतून शिवसंकल्पाच्या योगानी अनंत दिशांनी , अनंत शाखांमधून विभाजित होणारी शक्ति सृष्टीच्या माध्यमातून दृष्यमान होते . ही अनुप्रसव प्रक्रिया, हेच " अध: शाखम् ". 

अश्व: चा एक अर्थ ज्याची गति तीव्र आहे असा आहे. गति असणारे ते सर्व अशाश्वत आणि त्या विरोधी श्व: म्हणजे स्थिर म्हणजे शाश्वत , नित्य. 

तत्वतः पुढे चालणे किंवा उर्ध्वगति म्हणजे स्थूलातून सूक्ष्माकडे , शाश्वताकडे चालणे आणि सूक्ष्मातून स्थूलाकडे चालणे म्हणजे अध:गति .


संत चोखामेळा म्हणतात , 

" ऊस डोंगा परि रस नाही डोंगा 

  का रे मुलालाही वरलिया रंगा " 

वरवरच्या भ्रमित करणार्या शब्दार्थापेक्षा भावार्थ अन्  गूढार्थाकडे लक्ष द्यावे . खरे अमृत दोहन ते आहे. 🙏🙏


अनिरुद्ध कवीश्वर -

Wednesday, July 6, 2022

मन एव मनुष्याणाम् कारणम् बन्धमोक्षयो:

 मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः । बन्धाय विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं स्मृतम् ॥


मन ही सभी मनुष्यों के बन्धन एवं मोक्ष की प्रमुख कारण है। विषयों में आसक्त मन बन्धन का और कामना-संकल्प से रहित मन ही मोक्ष (मुक्ति) का कारण कहा गया है ॥


मनाच्या वृत्ती सारख्या बहिर्गामी तर कधी अंतर्यामी कल्पनाविलासात रमलेल्या असतात. स्वप्न आणि जागृती यांचा लपंडाव सुरु असतो. तळ्यात मळ्यात असल्यासारखी परिस्थिती. मनाचा जोर इतका जबरदस्त असतो की त्यायोगे बुद्धी आपल्या कोणत्याही कृतींचे समर्थनार्थ प्रतिवाद करुन सत् पासून दूर जाते. मोहाचे क्षण बंधनात टाकत आहेत याची जाणीव सुध्दा होऊ देत नाही. अशा मोहाचा नाश म्हणजेच मोक्ष. 


जसजसे तुम्ही अध्यात्मात खोल तन्मयता साधू जाता तेव्हा माया आपले मायाजाल अधिक गडद करते. 


आपल्याला असं वाटू लागतं की आता आपल्याला सर्व ज्ञान प्राप्त झालंय . आपली कृतिशून्यता म्हणजे उच्च दर्जाची कार्यक्षमता अशी समजूत मन करुन द्यायला लागते. तो फार निसरडा क्षण असतो. 


प्रकृति अनंत मार्गाने आपल्याला भुलवते. आपलं डोकं भिन करुन टाकते. आपण जे काही करतो ते योग्यच आहे किंबहूना तेच योग्य आहे असा मनाचा पक्का समज होतो अन् केव्हा आपला मार्ग अहंकाराच्या दिशेनी निघाला समजतच नाही. 


अखंड सावधानता आणि अंतर्मुख होऊन पुन्हा पुन्हा आपल्या वृत्ती तपासून घ्याव्या लागतात.  


नामस्मरणाने चित्ताची प्रसन्नता अनायासेच येऊ लागते. 🙏🙏🌹


अनिरुद्ध कवीश्वर -