ताटीचे अभंग १ ते १२
१
संत जेणें व्हावें । जग बोलणे साहावें ॥१॥
तरीच अंगी थोरपण। जया नाही अभिमान ॥२॥
थोरपण जेथे वसें । तेथे भूतदया असें ॥३॥
रागें भरावे कवणाशी। आपण ब्रम्ह सर्वेदेशी ॥४॥
ऐशी समदृष्टी करा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥५॥
२
योगी पावन मनाचा।साही अपराध जनाचा ॥१॥
विश्व रागें झाले वन्ही। संती सुखें व्हावें पाणी ॥२॥
शब्द शस्त्रं झालें क्लेश । संती मानावा उपदेश ॥३॥
विश्व पट ब्रह्म दोरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥
३
सुखसागरी वास झाला।उंच नीच काय त्याला॥१॥
अहो आपण जैसे व्हावें। देवें तैसेंचि करावें ॥२॥
ऐसा नटनाटय खेळ। स्थिर नाही एकवेळ ॥३॥
एकापासुनी अनेक झाले। त्यासी पाहिजे सांभाळिले ॥४॥
शून्य साक्षित्वें समजावें । वेद ओंकाराच्या नावें ॥५॥
एकें उंचपण केले। एक अभिमानें गेलें ॥६॥
इतकें टाकुनी शांती धरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥७॥
४
वरी भगवा झाला नामे। अंतरीं वश्य केला कामें ॥१॥
त्याला म्हणूं नये साधू। जगी विटंबना बाधू॥२॥
आपआपणा शोधून घ्यावें। विवेक नांदे त्याच्या सर्वे ॥३॥
आशा दंभ अवघे आवरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥
५
संत तेचि जाणा जगीं। दया क्षमा ज्यांचे अंगी ॥१॥
लोभ अहंता न ये मना। जगी विरक्त तोची जाणा ॥२॥
इह परलोकीं सुखी। शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखीं ॥३॥
मिथ्या कल्पना मागें सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥
६
एक आपण साधू झाले। येर कोण वाया गेले ? ॥१॥
उठे विकार ब्रह्मी मूळ। अवघे मायेचें गबाळ ॥२॥
माय समूळ नुरे जेव्हां। विश्व ब्रह्म होइल तेव्हां ॥३॥
ऐसा उमज आदिअंतीं। मग सुखी व्हावे संती ॥४॥
चिंता क्रोध मागे सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥५॥
७
ब्रह्म जैसें तैशा परी।आम्हा वडील भूतें सारी ॥१॥
अहो क्रोधे यावें कोठे । अवघे आपण निघोटे ॥२॥
जीभ दातांनी चाविली। कोणें बत्तीशी तोडीली? ॥३॥
मन मारुनी उन्मन करा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥
८
सुखसागर आपण व्हावें । जग बोधें निववावें ॥१॥
बोधा करुं नये अंतर । साधू नाहिं आपपर ॥२॥
जीव जीवासी पैं दयावा । मग करूं नये हेवा ॥३॥
तरणोपाय चित्तीं धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥
९
सांडी कल्पना उपाधी। तीच साधूला समाधी॥१॥
वाद घालावा कवणाला। अवघा द्वैताचा हो घाला॥२॥
पुढे उमजेना काय । उडत्याचे खाली पाय ॥३॥
एक मन चेष्टा करी। भूतें बापुंडी शेजारी ॥४॥
अवघी ईश्वराची करणी। काय तेथें केलें कोणीं ॥५॥
पुन्हा शुद्ध मार्ग धरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥६॥
१०
गिरीगव्हारे कशासाठीं। रागें पुरवीली पाठी ॥२॥
ऐसा नसावा संन्यासी। परमार्थाचा जो कां द्वेषी ॥३॥
घर बांधिले डोंगरी। विषया हिंडे दारोदारीं ॥४॥
काय केला योगधर्म। नाही अंतरी निष्काम ॥५॥
गंगाजळ हृदय करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥६॥
११
अहो क्रोधे यावें कोठे । अवघे आपण निघोटे ॥१॥
ऐसे कळलें उत्तम । जन तेची जनार्दन ॥२॥
ब्रीद बांधिलें चरणीं । नये दावितां करणीं ॥३॥
वेळे क्रोधाचा उगवला। अवघा योग फोल झाला॥४॥
ऐशी थोर दृष्टी धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥५॥
१२
अवघी साधन हातवटी। मोलें मिळत नाही हाटीं ॥१॥
शुद्ध ज्याचा भाव झाला। दूरी नाही देव त्याला॥२॥
कोणी कोणास शिकवावें । सार साधुनिया घ्यावें ॥३॥
लडिवाळ मुक्ताबाई। जीव मुदल ठायीचे ठायीं ॥४॥
तुम्ही तरुनी विश्व तारा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥५॥
सारा खेळ माझाच हा
मीच मांडिला मोडिला
अवघे अस्तित्व माझेच
मीच राखिले अन् विरवीले
स्वानंदे रचिली कहाणी
नसे इथे दूजा कोणी
आपुलेच शब्द अन् गाणी
आळविणे सूर निजकंठी
विस्तार माझ्या कल्पनेचा
माझ्या हाती न राहिला
पुढे सरता वाढता जाई
आकळिले तरी वळत नाही
" मन मारुनी उन्मनी करावे "
असे जेव्हा मुक्ताबाई माऊलीला समजावून सांगते तेव्हा अपेक्षाभंगातून निर्माण झालेल्या क्रोध आणि उद्वेगातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवते. संतांची शब्दयोजना ( टर्मिनालॉजी ) वेगळी असेल पण आधुनिक मानसशास्त्राच्या सीमा त्यांनी ओलांडून निखळ सत्याचा मार्ग स्वतः च्या जीवनदर्शनातून मांडला आहे.
अनिरुद्ध कवीश्वर-