Thursday, June 30, 2022

दर्शन शास्त्र

 आपण देवदर्शनाला जातो तेव्हा आजूबाजूची परिस्थिती पाहून अनंत विचार आपल्या मनामध्ये येतात. कधी भिक मागणे अस्वस्थ करते , कधी अस्वच्छता , कधी दर्शनासाठी ची ढकला ढकली , कधी पैशाचा चाललेला दुरुपयोग तर कधी छोट्या छोट्या गोष्टींवरुन चिडचिड करणार्या दर्शनार्थीं ना पाहून नेमके हे देवदर्शनासाठी आले की कशासाठी हा प्रश्न उभा रहातो. 

प्रासंगिक आणि सांसारिक प्रश्नांचा भुंगा मनाला पोखरत असताना भगवंताची स्मृति बाजूलाच रहाते. 

दर्शनासाठी रांगेत उभे असताना मनांत असंख्य विचारांची गर्दी होते. भगवंताच्या विग्रहाचे आपण दर्शन घेतो म्हणजे खरोखर 

" डोळ्यानी पाहीन रुप तुझे .." असे होते का? 

मनोमन आपण त्या ईशतत्वापाशी एकरुप होतो की जीवनामधल्या समस्यांच्या उत्तरांची अपेक्षा करत असतो ? हा देव मला चिंतामुक्त करील अशी आशा करतो ? बरं तो तसा ठामपणे विश्वास ठेवण्याची आपल्या मनाची तयारी असते का ? की सोयीनुसार आपण ठरवतो ? आपलं काम झालं तर हा देव खरा नाही तर दगड ? 

मन हे सहावं इंद्रिय असलं तरी पंचमहाभूतांनी तयार झालेल्या कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रिये या दश इंद्रियांवर मनाचे वर्चस्व असते. सदसद्विवेकबुद्धी नी निर्णय दिल्यावर ही देहाधिष्ठीत जीवा ला फरफटत ओढून नेण्याची शक्ती मनामधे असते. 

आपल्या विचारांशी आपलाच झगडा सुरू असतो त्याचाच उल्लेख करताना तुकाराम महाराज म्हणतात " रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग ". आशा निराशेच्या खेळात त्रयस्थपणे , साक्षीभावाने प्रत्येक गोष्ट अनुभवणे म्हणजे अंतर्मनाच्या शुध्दिकरणाची प्रक्रिया. 

खरं म्हणजे तीर्थस्थळी देवदर्शनापेक्षा या अशा आत्मदर्शनाची संकल्पना मला जास्त संयुक्तिक वाटते. 

अनिरुद्ध कवीश्वर -


Thursday, June 9, 2022

मनाची प्रयोगशाळा

 मनाची प्रयोगशाळा !! 


खरोखर मनाच्या आंत डोकावण्याची इच्छा होईपर्यंत धडाधड नवनवीन गॅझेटस् मनाचा ताबा घेतात . त्याचा उपयोग उत्तमरित्या समजेपावेतो दुसरं काही अंगावर धडकतंय. सॅटेलाईट च्या माध्यमातून रिमोट प्लेसेस वरुन सर्जरी करणं शक्य झालंय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स नी हळूहळू मशीन्सवर ताबा मिळवला आहे. लॉग डिस्टन्स सेन्सर्स मुळे दूर अंतरावर असलेल्या व्यक्तिचा स्पर्श अनुभवण्या इतपत प्रगति आधुनिक शास्त्रांनी केली आहे. वर्चुअल आणि रिअल त्यामधली रेषा धूसर होत  मनाला स्वतः चे अस्तित्व विसरायला लावणारी अवस्था. चांगली की वाईट ? धरलं तर चावतं सोडलं तर पळतं अशी गति. प्रचंड वेग आहे या सर्वाला. जीव धास्तावतो. टाईम प्लीज म्हणून थोडी विश्रांती घ्यायची म्हणजे आपण जगाच्या मागे पडू अशी भीति . 

सोयीसाठी वाहन म्हणता पायी चालण्यातला आणि चालता चालता स्वतः शी संवाद साधण्याचा आनंद दुरावत चाललाय असं भासू लागतं. 

"वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ..." तुकाराम महाराज म्हणतात तो आनंदाचा ठेवा. मन ओढावतं. 🙏🌹

एकविसाव्या शतकात असलो तरी अजून ही शेणानी सारवलेले अंगण , त्यावर काढलेली सुबकशी रांगोळी ,  तुळशी वृंदावन , सांजवेळी लावलेला दिवा , अबोली , तगर , दूध मोगरा , मोगरा , कुंदा , शेवंती , जाईजुई चे वेल , तो मातीचा सुगंध मनात भक्कम रुजलाय. 

शेणानी सारवलेल्या अंगणात गवत काड्यांची चटई पसरवून एकत्र बसून केलेला फराळ असो की पत्त्यांचा डाव, मातीचा उबदार स्पर्श अजून हवाहवासा वाटतो. कुठेतरी आपण जमीनीशी जोडून असलेली नाळ निसटल्यासारखे वाटते. आकाशात उंच उडालेल्या पण  दोर तुटलेल्या पतंगासारखी अवस्था वाटते. 

आजच्या काळातील मनोरंजनाची इतकी साधनं नव्हती. मैदानी खेळ , झाडांवर चढणे , शक्य तेवढे पायीच फिरणे माहिती. चातुर्मासात कीर्तन , प्रवचन , कथाकथन , व्याख्यानमाला हीच मनोरंजनाची अन् प्रबोधनाची साधनं . आजच्या टीव्हीवरच्या मालिका आणि धंदेवाईक वेबसिरीज त्याकाळी नव्हत्या याचा आज आनंद वाटतो. भरपूर खेळणे , व्यायाम , उत्तमोत्तम पुस्तके वाचणे , घरचेच खाणे यावर पोसलेल्या व्यक्ति भाग्यवान. शरीराची अन् मनाची ही मशागत चांगली झाली. 

आज मागे वळून पहाताना आपण मोठा काळ सांस्कृतिकदृष्ट्या समृध्द भारतात जगलो असं जाणवतं.  शारिरीक कष्ट झाले तरी मनाची शांतता समाधान देते.