स्वतः शी स्वतः चा संवाद...
गुरुपाशी केवळ शारण्यभाव असावा हे आपल्या मनावर सतत बिंबवले गेले आहे. तसा गुरु सापडणे आजच्या काळात दुर्मिळ, कठीण आहे पण अशक्य नाही. गुरु ला शोधण्याची गरज नाही. तेच तुम्हाला शोधतात. भारतात अव्याहतपणे सद्गुरू परंपरा चालत आली आहे जी विशिष्ट पातळीवर आत्मज्ञाना ची प्रत्यक्ष अनुभूती घडवणयास सहाय्यभूत ठरते .
आपल्या महाराष्ट्राचे दैवत असलेला विट्ठल दोन्ही हात कमरेवर ठेवून आहे. देणे - घेणे असा व्यवहार नाही.
आजच्या काळात पुस्तके हेच गुरु असे बर्याच लोकांना वाटते. शिख धर्मामधे " गुरु ग्रंथ साहिब" या त्यांच्या धार्मिक ग्रंथालाच गुरु संबोधले आहे. यात संत नामदेवांच्या ही रचना आहेत.
वैचारिक क्षमता वाढवण्यासाठी , मन मोठे करण्यासाठी , माहिती मिळण्यासाठी पुस्तके साथ देतात .
एका पुस्तकाचे नांवच खूप काही सांगून जाते.
" पावलापुरता प्रकाश "
आपण समजूती च्या , जाणिवांच्या ज्या स्तरावर असतो त्याच्या पुढे फक्त एका पाऊलपुरता प्रकाश पडतो. जो दिशेचे मार्गदर्शन करतो.
आत्मभान आणणारे ज्ञान आपोआप अंतर्मनात प्रकाशते त्यावेळी मन निर्विकल्प एकतानता साधते. अन् निसर्गाशी एकरुप होणे सहजक्रिया होते.
तुकाराम महाराज म्हणतात तसे -
वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें ।
पक्षी ही सुस्वरें आळविती ।।
येणें सुखें रुचे एकांताचा वास ।
नाही गुण दोष अंगा येत ।।
आकाश मंडप पृथुवी आसन ।
रमे तेथें मन क्रीडा करी ।।
कंथाकुमंडलु देहउपचारा ।
जाणवितो वारा अवसरु ।।
हरिकथा भोजन परवडी विस्तार ।
करोनि प्रकार सेवूं रुची ।।
तुका म्हणे होय मनासी संवाद ।
आपुला चि वाद आपणांसी ।।
-संत तुकाराम
हा आपल्या मनाशी होणारा संवाद फार महत्वाचा आहे.
मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः । बन्धाय विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं स्मृतम् ॥ अमृतबिंदूउपनिषद ll२ll
मन हेच मनुष्याला बंधनात टाकण्यास अथवा मुक्त करण्यास कारणीभूत आहे.
अनिरुद्ध कवीश्वर -